जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय : ग्रामीण व कृषी पर्यटनातून रोजगार निर्मिती : 25 लाख निधीची तरतूद
प्रतिनिधी/पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये चिंचणी या गावाला ‘ब’ वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यात आलेला आहे. हे गाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या वर्षाकरिता चिंचणीस 25 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
चिंचणी गावाने गेल्या पंधरा वर्षांमध्ये पर्यावरणाचे संवर्धन करत वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची, वनौषधी ,फुलांची ,वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्यात आलेली आहे.यामुळे गावात नैसर्गिक वातावरण निर्माण होऊन पक्ष्यांचे,फुलपाखरे यांचे प्रमाण भरपूर आहे. गावामध्ये कोणत्याही कारणासाठी गेल्या चार वर्षा पासुन फटाके वाजवले जात नाहीत. याच बरोबर गावातील संपूर्ण पाणीपुरवठा योजना सोलर वर सुरू आहे. या गावांमध्ये असणारी अभ्यासिका, स्वच्छ व सुंदर शाळा, राहण्याची सोय, इत्यादी गोष्टीमुळे व शहरी लोकांना ग्रामीणजीवनशैली, परंपरा, खाद्यसंस्कृती हे समजण्यासाठी हे गाव पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे.
यासाठी नव्यानेच जिल्हा नियोजन समितीने पर्यटनाचा दर्जा दिल्यामुळे गावातील लोकांना गावांमध्येच रोजगार उपलब्ध होणार आहे. हे गावाच्या सार्वजनिक मालकीचे आणि सर्वांचा हिस्सा असणारे हे पहिलेच ग्रामीण व कृषी पर्यटन केंद्र आहे. यामुळे गावातील सर्वांना रोजगार उपलब्ध होणार असून गावचा विकास दर वाढण्यामध्ये मोठा सहभाग राहणार आहे .
आ. बबनराव शिंदे यांचा पाठपुरवठा
आ.बबनराव शिंदे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा करून भरीव निधीची तरतुद केली आहे.जिल्हा नियोजन अधिकारी श्री दराडे यांनी या बाबतची घोषणा केल्यानंतर आ.सुभाष देशमुख यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.