दिव्यांच्या रोषणाईने मंदिर परिसर उजळला : स्वच्छता उपक्रमाला देवस्थान समितीचे सहकार्य
प्रतिनिधी /बेळगाव
अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. याच उद्देशाने जत्तीमठातील दुर्गादेवी मंदिरात दीपोत्सव साजरा करीत असल्याचे अध्यक्षा नीता पाटील यांनी सांगितले.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जायंट्स सखीच्यावतीने जत्तीमठातील दुर्गादेवी मंदिरात दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. अध्यक्षा नीता पाटील, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर, माजी अध्यक्षा नम्रता महागावकर व इतर पदाधिकाऱयांच्या हस्ते दीपप्रज्वलित करण्यात आले. यामुळे जत्तीमठ परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता.
दीपोत्सवामुळे भक्तांना अत्यंत मनमोहक असे दृश्य पहावयास मिळाले. त्यानंतर दुर्गादेवीची साडी, खण आणि नारळांनी ओटी भरून सामूहिक आरती करण्यात आली. तत्पूर्वी आदल्या दिवशी संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता उपक्रमासाठी जत्तीमठ देवस्थान समितीने विशेष सहकार्य केले.
यावेळी उपाध्यक्षा चंद्रा चोपडे, विद्या सरनोबत, लता कंग्राळकर, अर्चना पाटील, शीतल नेसरीकर, ज्योती पवार, अनुपमा कोकणे, दीपा पाटील, राजश्री हसबे, वरदा अंगडी, मनीषा कारेकर, सविता मोरे, अपर्णा पाटील, भाग्यश्री पवार, दीपा मुतकेकर उपस्थित होत्या.