वेद याचा अर्थ आहे ज्ञान. या ज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे भौतिक ज्ञान म्हणजे आपल्या इंद्रियांनी प्राप्त होणारे, अनुभवता येणारे ज्ञान आणि दुसरे आहे आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आपण आत्मा आहोत हे जाणून त्याचा अनुभव घेऊन प्राप्त होणारे ज्ञान. या दोन्ही ज्ञान प्राप्त करण्याच्या पद्धती वेगवेगळय़ा आहेत. सामान्यतः लोकांमध्ये अगदी समाजातील बुद्धिमान गणल्या गेलेल्या व्यक्तींनासुद्धा वेद समजणे कठीण आहे. त्यामुळे वेदाबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमजुतीही आहेत. आपल्यामध्ये चार प्रकारचे दोष असल्याने वेदांचे ज्ञान आपल्याला स्वतःच्या बुद्धीने समजणे शक्मय नाही. पहिला दोष आहे आपण सर्व भ्रमात आहोत. म्हणजे जे अस्तित्वात नाही त्याचा स्वीकार करतो. प्रत्येकजण शरीरालाच आपले स्वरूप समजतो. कोणी जर आपल्याला विचारले आपण कोण आहात? तर आपण म्हणू मी शरद आहे, मी श्रीमंत आहे, मी भारतीय आहे, मी पुरुष आहे, मी बुद्धिमान आहे. अशा ज्या काही कल्पना आहेत त्या आपल्या शरीराची ओळख करून देतात. यालाच भ्रम असे म्हणतात. कारण आपण शरीर नसून आत्मा आहोत, शरीर हे एक आवरण आहे. दुसरा दोष आहे आपण सर्वजण चुका करतो. इंग्रजीमध्ये एक म्हणसुद्धा आहे की ‘चुका करणे हा माणसाचा स्वभाव आहे’. मग त्या चुका आपण जाणीवपूर्वक करत असू अथवा अजाणतेपणे करीत असू. ह्यातूनच तिसरा दोष उत्पन्न होतो तो म्हणजे आपणामध्ये फसविण्याची वृत्ती आहे. एखादा मूर्खदेखील बुद्धिमान असल्याचा बहाणा करतो. तो भ्रमात असून त्याच्या हातून चुका घडतात असे त्याला दाखवून दिले तर तो म्हणतो ‘माझ्या मते हे असे आहे, ते तसे आहे’ त्याला स्वतःची स्थितीदेखील माहीत नसते आणि तरी तो तत्त्वज्ञानावर पुस्तके लिहितो. हाच त्याला जडलेला रोग आहे आणि ही शुद्ध फसवणूक आहे आणि चौथा दोष आहे आपली इंद्रिये अपूर्ण आहेत. उदाहरणार्थ, आपल्या डोळय़ांचा आपल्याला खूप अभिमान असतो. पण एका अंधकारमय खोलीत आपल्याला आपले हातही दिसू शकत नाहीत, सूर्य तर आपल्याला एका तेजस्वी थाळीप्रमाणे वाटतो म्हणून या इंद्रियाकडून आपण ज्ञानाची अपेक्षा करू शकत नाही. यावरून ‘दिसते तसे नसते, म्हणून जग फसते’ ही म्हण कदाचित आली असावी.
ज्ञान प्राप्त करण्याच्या तीन पद्धती आहेत, ज्याला प्रमाण असे म्हटले जाते. एक आहे प्रत्यक्ष, ज्यामध्ये आपण डोळय़ाने पाहतो त्यावर विश्वास ठेवतो, दुसरे अनुमान म्हणजे आपण तर्कवितर्क करतो ‘हे असे असेल, तसे असेल’ पण या दोन्ही पद्धतीमध्ये वरील चार प्रकारचे दोष आहेत. तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे शब्द प्रमाण, म्हणजे अधिकारी व्यक्तीकडून, उदाहरणार्थ आपले वडील कोण आहेत हे केवळ आईकडूनच आपल्याला ज्ञात होते. वेदांना श्रुती असेही म्हणतात. वेदांचे ज्ञान हे अधिकारी व्यक्तीकडून श्रवणाने प्राप्त केले जाते. आध्यात्मिक क्षेत्रातील श्रीपाद मध्वाचार्य, श्रीपाद रामानुजाचार्य, निंबार्क स्वामी, विष्णुस्वामी, शंकराचार्य, संत तुकाराम अशा सर्व अधिकारी व्यक्तींनी वेदांचे ज्ञान भगवान श्रीकृष्णापासून चालत आलेल्या परंपरेमार्फत स्वीकारले, त्याचा अनुभव घेतला आणि सर्व जीवांच्या उद्धारासाठी प्रचारही केला. वेदांचे ज्ञान हे अंधश्रद्धा अथवा भावनावश होऊन प्राप्त केलेले ज्ञान नाही तर साक्षात अनुभवावर आधारित ज्ञान आहे. श्रीकृष्णांनी सर्व सृष्टीची रचना केली आणि त्याबद्दलचे ज्ञानही त्यांनीच दिले आहे. या तत्त्वाचा स्वीकार सर्व आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींनी केला आहे आणि हे ज्ञान परंपरेतून आजही जसे आहे तसे उपलब्ध आहे. भगवान श्रीकृष्ण भगवतगीतेमध्ये सांगतात (भ गी 15.15) सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् । अर्थात ‘मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदाद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निःसंदेह मी वेदान्ताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे’. यावरून स्पष्ट होते की सर्व वैदिक ज्ञान हे परिपूर्ण भगवान श्रीकृष्णापासून परंपरेने चालत आलेले आहे आणि सर्व आचार्यांनी त्याचे जसे आहे तसे ते स्वीकारले आहे म्हणून हे वैदिक ज्ञान वर उल्लेखिलेल्या चार दोषापासून मुक्त आहे. जो कोणी या वैदिक ज्ञानाचा या मार्गाने स्वीकार करतो तोही त्या चार दोषापासून मुक्त होऊ शकतो. सर्व वेद समजण्याचा हा एकमेव मार्ग आहे. परंतु दुर्दैवाने कलियुगाच्या प्रभावाने कोणीही, कुठलाही साक्षात्कार नसताना वेदांवर भाष्य करू लागतो त्यामुळे तो स्वतःही भ्रमित होतो आणि दुसऱयांनाही भ्रमित करून सोडतो. स्वतः भगवान श्रीकृष्ण हे आध्यात्मिक ज्ञान कोणाला समजेल हे सांगताना म्हणतात, (भ गी 4.3) स एवायं मया ते।़द्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तो।़सि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् । अर्थात भगवंताशी असणाऱया संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जणू शकतोस. यातून स्पष्ट होते की वैदिक ज्ञान समजून घ्यायचे असल्यास अर्जुनासारखे श्रीकृष्णभक्त असावयास हवे. जो श्रीकृष्णभक्त नाही त्याला वेदांचा खरा अर्थ समजणे अशक्मय आहे. अर्जुन हा श्रीकृष्णाचा पूर्ण पुरुषोत्तम म्हणून स्वीकार करतो कारण त्याचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आणि जो कोणी भक्तिपूर्वक अर्जुनासारखा श्रीकृष्णाच्या भगवतगीतेतील आज्ञांचे पालन करतो त्यालाही वैदिक ज्ञान सहजतेने समजते. जे भगवान श्रीकृष्णांना वास्तविक स्वरूपात स्वीकारीत नाहीत असे लोक एकतर भगवतगीतेचा आधार घेऊन स्वतःच्या मताचा प्रसार करतात अथवा वेगवेगळे अर्थ काढून लोकांना श्रीकृष्णाच्या उपदेशापासून दूर नेतात. म्हणून केवळ हरिभक्तांकडूनच वेदांचे विशेषतः गीता-भागवतचे ज्ञान समजावून घ्यावयास हवे.
संत तुकारामही एका अभंगात अधिकाराने हेच समजावून सांगत आहेत. ते म्हणतात,
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।। 1।। खादल्याची गोडी देखिल्यासी नाही । भार धन वाही मजुरीचे ।।2।। उत्पत्ती पाळण संहाराचे निज । जेणे नेले बीज त्यांचे हाती ।।3।। तुका म्हणे आम्हा सापडले मूळ। आपणचि फळ आले हाता ।।4।।
अर्थात ‘वेदांचा अर्थ आम्हा हरिभक्तानाच खरोखर कळतो, इतर केवळ वेदपंडित म्हणून ज्ञानीपणाच्या गर्वाचे ओझे डोक्मयावर वाहतात. जो अन्न खातो त्याला अन्नाची चव जी अनुभवास येते, ती चव नुसते अन्न पाहणाऱयास येत नाही तसेच धनाचे ओझे वाहणाऱया मजुरास त्या धनाचा फायदा होत नाही. विश्वाची उत्पत्ती, पालन व संहार करणाऱया भगवान श्रीकृष्णाने ते निजबीज स्वतःच्या हाती ठेवले आहे, त्याला जो हरिभक्त आपलासा करतो त्यालाच वेदांचा अर्थ कळतो. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या हाती सर्व सृष्टीचे आणि वेदांचे मूळ असलेला श्रीकृष्ण आम्हास सापडला आहे त्यामुळे वेदांचे फळही आमच्या हाती आले आहे.’ सारांश हाच आहे की तथाकथित बुद्धिवादी यांच्याकडून गीता-भागवत इत्यादी वैदिक ज्ञान प्राप्त न करता प्रामाणिक हरिभक्ताकडूनच या ज्ञानाचा स्वीकार करावा. सर्व वेदांचे सारही एका अभंगात ते वर्णन करतात वेद अनंत बोलिला। अर्थ इतुकाची साधिला । विठोबासी शरण जावे । निजनि÷s नाम गावे ।। अर्थात वेदामध्ये अनेक विषयांची माहिती आहे पण सर्वांचे सार एकच आहे विठोबाला शरण जावे आणि त्याचे नि÷sने नामस्मरण करावे.
-वृंदावनदास