ऑनलाईन टीम / नवी मुंबई
सुमारे महिनाभर विविध मागण्यांसाठी सुरु आहे. एस टी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत कर्मचाऱ्यांनी प्रारंभी आक्रमक पवित्रा घेत राज्य शासनाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव तंत्राचा अवलंब केला. यावर राज्य शासनाने आघाडी सरकारमधील ज्येष्ट नेत्यांच्या सल्याने हा पेच सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यातुन एस टी कर्मचारी आणि राज्य शासन यांनी चर्चेतुन मार्ग काढण्यासाठी सुवर्णमध्य साधत संप मिटवण्याचा प्रयत्न करत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला एसटी कर्मचाऱ्यांचा ही प्रतिसाद मिळत असुन सोमवारी राज्यभरातील विविध आगारात सुमारे १९ हजार कर्मचारी कर्तव्यावर रूजू झाले. कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवारी २५० आगारांपैकी १०५ आगारातून वाहतूक सुरु झाली आहे. दरम्यान, रविवारी ७३४ बसेसद्वारे सुमारे १७०३ फेऱ्यांच्या माध्यमातून १ लाख ०४ हजार ८०० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या वाहतूकीतून महामंडळाच्या तिजोरीत ७६ लाख ३० हजार रूपयांची भर पडली आहे.
याच पार्श्वभुमीवर मंत्री अनिल परब यांनी ज्या कर्मचाऱ्यांना कामावर परतायचे आहे, परंतु त्यांची कोणी अडवणूक करत असेल अशा लोकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देणार असल्याचेही मंत्री परब यांनी घोषित केले होते.