राजकीय पक्षांकडून स्वहिताचाच विचार होत असल्याचे सामोरे
प्रतिनिधी /बेळगाव
अतिवृष्टीवरील चर्चेवर शुक्रवारी विधानसभेत सरकार उत्तर देणार होते. मात्र, नगरविकासमंत्री भैरती बसवराज यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे विधानसभेत गदारोळ झाला. त्यामुळे शुक्रवारी सरकारने उत्तर दिले नाही. आता सोमवारी सरकार उत्तर देणार आहे.
शुक्रवारच्या विषयपत्रिकेतही अतिवृष्टीवरील चर्चेवर सरकार उत्तर देणार, याचा उल्लेख होता. प्रश्नोत्तर व शून्य तासानंतर भैरती बसवराज व आमदार शंकर यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. विधानसभेत स्थगन प्रस्तावही मांडला. त्यामुळे एकच गदारोळ सुरू झाला.
गदारोळ सुरू असतानाच सभाध्यक्ष कागेरी यांनी अतिवृष्टीवरील चर्चेला सरकारने उत्तर द्यावे, असे सुचवले. गेल्या चार दिवसांत 37 आमदारांनी या चर्चेत भाग घेतला आहे. साडेआठ तास चर्चा झाली आहे. आता सरकारने आपली बाजू मांडावी, असे वारंवार आवाहन करण्यात आले. मात्र, गदारोळ सुरू असताना मी काय उत्तर देणार आहे, असा प्रश्न महसूलमंत्री आर. अशोक यांनी उपस्थित केला.
यावर एकतर उत्तर सभागृहात मांडा किंवा सोमवारी उत्तर द्या, असा सल्ला सभाध्यक्षांनी दिला. त्यानंतर महसूलमंत्र्यांनी सोमवारी उत्तर देण्याचे सांगितले. उत्तर कर्नाटकावरील ज्वलंत समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी बेळगाव येथे अधिवेशन भरविण्याचा टेंभा मिरवणाऱया राजकीय पक्षांच्या नेत्यांनी समस्या व त्यावर तोडगा काढण्यापेक्षा राजकीय हिताचा विचार करीत कामकाजात भाग घेतल्याचे दिसून येते.