खूप पूर्वी गुरुकुल पद्धतीने शिकण्याची आणि शिकवण्याची प्रथा होती. त्याकाळी एका आश्रमात एक गुरू सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांना निःस्वार्थ वृत्तीने शिकवत असत. त्या आश्रमात राजा-महाराजांच्या राजपुत्रांपासून ते एखाद्या निष्कांचन कुटुंबातील मुलं एका समान पातळीवर शिकत असत. ते अनेक प्रकारच्या विद्या तेथे शिकत असत.
एके काळी गुरूंनी सर्व विद्यार्थ्यांना काही वेळाकरिता एका ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगितले. थोडय़ावेळाने तेथे त्यांचे गुरू आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनातील सुख-दुःख, प्रेम, आदर, अपमान, ऐश्वर्य-दारिद्रय़, ज्ञान-अज्ञान, यश-अपयश ह्याविषयी उपदेश दिला. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी एक प्रश्न विचारला की, ‘आपण ज्या सृष्टीत राहतो ती एक कल्पना आहे. जर सृष्टि ही कल्पना असेल तर ह्या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट ही कल्पनाच आहे. ह्या सृष्टीतील सजीव आणि निर्जीव वस्तूसुद्धा कल्पनाच आहे. परंतु, तरीही ह्या सृष्टीत असणाऱया सजीव प्राण्यांना ह्या सृष्टीचे व्यर्थत्व का पटत नसेल?’
विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. काही दिवसांनी गुरूंनी पुन्हा सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलवले. विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्नाचे उत्तर देण्याची विनंती केली. त्यावर गुरु असे म्हणाले की, ‘सृष्टी जरी एक कल्पना असली तरीही सजीव बुद्धीला त्या कल्पनेचे अस्तित्व मान्य नाही. कारण सजीव मन हे सजीव बुद्धीवर नेहमीच सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करते. सजीव मनाला सृष्टीच्या काल्पनिकतेचे सत्य आणि वास्तविकता पटत नाही. त्यामुळेच बुद्धी मनाच्या ताब्यात जाते आणि सृष्टीच्या काल्पनिकतेचे अस्तित्व मान्य करत नाही. त्यामुळेच सजीव प्राण्यांना सृष्टीचे व्यर्थत्व पटत नाही, जाणवत नाही.’
ह्यावर विद्यार्थ्यांनी उपाय विचारला. गुरूंनी त्यावर उपाय असा सांगितला की, ‘जोपर्यंत आपल्या पंचेंद्रिय, मन आणि बुद्धी ह्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसेल तोपर्यंत सृष्टीच्या अस्तित्वाचा मोह प्रत्येक सजीव प्राण्याला होईल. हा मोहच त्या सजीव प्राण्याला सृष्टीकडे आकर्षित करेल. ह्यातूनच नवकल्पनांचा उदय होईल, प्रश्न-अडचणी निर्माण होतील. प्रश्नांना-अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण होईल. प्रश्न किंवा अडचणी सुटतील आणि पुन्हा नव्याने स्वतःचे स्वरूप बदलवून येतील. ह्या स्वरूप बदललेल्या प्रश्नांची आणि अडचणींची उत्तरे शोधली जातील. त्यावर मात केली जाईल. सृष्टीचे हे चक्र असेच सुरू राहील. ह्या सृष्टीच्या कालचक्राचे ज्ञान, त्याच्या स्थित्यंतराची जाणीव आणि त्याचे व्यर्थत्व जेव्हा सजीव प्राण्यांना कळेल तेव्हाच सृष्टीचे व्यर्थत्व पटेल.’
प्रत्येक सजीव प्राणी हा कळत-नकळतपणे इतर सजीव प्राण्यांवर अवलंबून असतो. सजीव प्राण्याची गरज आणि त्याची शोध घेण्याची वृत्ती, सुखी आणि समाधानी होण्याची वृत्ती त्याला कुठल्यातरी इतर सजीव प्राण्याच्या नियंत्रणात ठेवते. ह्यातूनच नेतृत्व आणि अनुकरण करण्याची वृत्ती जन्माला येते.
अनेकवेळा नेतृत्व अपयशी होतांना जाणवते आणि त्यामुळे अनुयायांचे नुकसान होते. जे तत्व नेतृत्वाने अनुयायांच्या माध्यमातून समाजात पेरायचे असते ते तत्वही फोल ठरते कारण ते नेतृत्व समर्थ नेतृत्व नसते.
समर्थ आणि सामर्थ्यवान नेतृत्वाच्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे श्रीसमर्थांच्या श्रीमददासबोध ग्रंथातील तत्वज्ञान होय! ह्याकरिता सुरुवातीलाच श्रीसमर्थ संपूर्ण मानवसमूहाला उद्देशून असे म्हणतात की,
“ग्रंथा नाम दासबोध।गुरुशिष्यांचा संवाद।
येथ बोलिला विशद। भक्तिमार्गे ।।01/01/02’’
ह्याचा अर्थ असा आहे की,
ग्रंथाचे नाव दासबोध असे आहे. ह्यात गुरू-शिष्यांच्या संवादरूपाने भक्तिमार्ग सांगितला आहे.
पुढे श्रीसमर्थ असे म्हणतात की,
“नाना संमती अन्वये।म्हणौनि मिथ्या म्हणतां नये ।तथापि हे अनुभवासि ये। प्रत्यक्ष आतां।।01/01/16’’
ह्याचा अर्थ असा आहे की,
अनेक शास्त्र, वेद-उपनिषदांच्या आधारे आणि मुख्य म्हणजे आत्मप्रचितीच्या स्वानुभवाने हा ग्रंथ लिहिला आहे. त्यामुळे ह्यास मिथ्या किंवा असत्य म्हणू नये.
साधकांना तसेच प्रत्येक मनुष्याला ज्यांना नेतृत्व करायचे आहे अशांना श्रीमददासबोध ग्रंथ वाचणे किती महत्वाचे आहे हे श्रीसमर्थ पुढील ओळींद्वारे स्पष्ट करत आहेत. श्रीसमर्थ असे म्हणतात की,
“भगवद्वचनीं अविश्वासे।ऐसा कोण पतित असे।
भगवद्वाक्मयावरहीत नसे ।बोलणें येथीचें।।
पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दुराभिमानी ।मत्सरें करी।।01/01/21-22’’
ह्याचा अर्थ असा आहे की, भगवद्वचनांवर विश्वास नाही असा कोणीही मनुष्य सहसा नसतो. ह्या ग्रंथात भगवदवाक्मयाशिवाय काहीही सांगितलेले नाही. म्हणून पूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय जो उगीचच त्या ग्रंथाला नावे ठेवतो तो मत्सर करणारा, दुरात्मा आणि दुराभिमानी असतो.
त्यानंतर, श्रीमददासबोध ग्रंथाच्या श्रवणाने, वाचनाने, मनाने आणि चिंतनाने नेतृत्व करणाऱयांच्या जीवनात कसे बदल घडून येतात ह्याविषयी श्रीसमर्थ असे म्हणतात की,
“आतां श्रवण केलियाचें फळ। क्रिया पालटे तात्काळ ।
तुटे संशयाचे मूळ ।येकसरा ।।
नासे अज्ञान दुःख भ्रांती। शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती।
ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ।।01/01/28-30’’
ह्याचा अर्थ असा आहे की,
दासबोधाच्या अभ्यासाने वागण्यांत, वृत्तीत बदल घडून येतो. मनांतील संशय दूर होऊन खरा मार्ग सापडतो. अज्ञान, दुःख आणि खोटय़ा समजुती ह्यांचा संपूर्ण नाश होऊन ज्ञानप्राप्ती होते. ही ह्या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्यांना स्वतःच्या भाव-भावनांवर नियंत्रण मिळवून नेतृत्व करायचे आहे अशा सर्वांनीच, श्रीसमर्थ रामदास स्वामींचा श्रीमददासबोध ग्रंथ सातत्याने वाचावा. त्याद्वारे ज्ञानप्राप्ती करवून घ्यावी, श्रीसमर्थांची कृपा आणि प्रभूश्रीरामचंद्रांचा आशीर्वाद प्राप्त करावा. प्रभू श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, छ. शिवाजी महाराज आणि स्वा. सावरकरांसारखे समर्थ नेतृत्व करावे. -माधव श्रीकांत किल्लेदार