कोल्हापूर / प्रतिनिधी
नवर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रातीकडे पाहिले जाते. या सणाची सुरूवात भोगीपासून होते. शहरातील घरोघरी पारंपारीक पध्दतीने तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, दही, विविध प्रकारच्या मिक्स भाज्या, राळय़ाचा भात, असे पदार्थ बनविण्यात आले होते. शेजारधर्म म्हणून एकमेकाला बाजरीची भाकरी, भाजी, गाजर कांद्याची पात आदी पदार्थांनी सजवलेले भोगीचे ताट देण्यात आले. देवघरात सुगडाचे पुजन करून गाईलाही नैवद्य म्हणून भोगीचे ताट दिले. शहरात गुरूवारी सायंकाळपर्यंत भोगीच्या सणाचा माहोल होता.
गुरूवारी भोगीच्या सणानिमित्त बाजरीची भाकरी, बरोबर गाजर, कांदा पात यावर सर्वांनी यथेच्छ ताव मारला. भोगीच्या निमित्ताने सुगडाचेही देवघरात पुजन केले. सुवासीनींनी एकमेकींना हळदी-कुंकु देऊन शुभेच्छा दिल्या. भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला अतिशय महत्व आहे. या सणाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखला जातो. त्यामुळे मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी अनेक सुवासिनींनी एकत्र ऐवून भोगीच्या जेवनाचा आनंद लुटला. घरामध्ये एक प्रकारे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. काही सुवासिनींनी गुरूवारी मकर संक्रातीचा ववसा यासह अन्य साहित्याची खरेदी केली. तसेच ऊस, ववसा आणि भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचेही निदर्शनास आले.