नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ब्रिटन भारताशी व्यापार करार करण्यासाठी उत्सुक आहे, असा संकेत मिळत आहे. युरोपियन महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर भारताशी स्वतंत्र करार करण्यास तो मोकळा झाला असून दोन्ही देश त्या दिशेने प्रगती करीत आहेत, अशी माहिती भारताचे उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी दिली.
ब्रिटनच्या व्यापार मंत्री ऍनी मेरी ट्रेव्हलिन यांनी यासंबंधीची चर्चा भारताशी करण्यात पुढाकार घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढावी आणि ते आर्थिकदृष्टय़ा एकमेकांच्या अधिक जवळ यावेत हा ब्रिटनचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
17 जानेवारीला दोन्ही देशांमध्ये चर्चेची पहिली फेरी होईल. काही महिन्यांपूर्वी ट्रव्हलीन या भारताच्या दौऱयावर आल्या होत्या. या दौऱयात या कराराची पूर्वपिठीका तयार करण्यात आली आहे. याच आधारावर चर्चा होईल. 2022 च्या अखेरपर्यंत दोन्ही देशांमध्ये सर्वंकष करार होण्याची शक्यता आहे. पुरवठा साखळी (सप्लाय चेन) आणि एफटीए यांवर दोन्ही देश भर देत आहेत.
2019 मध्ये भारत आणि ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 23 अब्ज पौंडापर्यंत पोहचला होता. या व्यापारामुळे दोन्ही देशांमध्ये साधारणतः पाच लाख रोजगार निर्माण झाले आहेत. भारत हा विश्वासार्ह व्यापारी भागीदार आहे, असा ब्रिटनचा अनुभव असून त्यामुळे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने दोन्ही देश सक्रीय आहेत, असे सांगण्यात आले आहे.