तिसऱया-चौथ्या स्थानासाठी प्ले-ऑफ लढतीत भारताचा चीनवर 2-0 फरकाने विजय
मस्कत-ओमान / वृत्तसंस्था
महिला गटातील आशिया हॉकी चषक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने शनिवारी तिसरे स्थान संपादन केले. शेवटच्या मिनिटापर्यंत चुरशीने लढवल्या गेलेल्या प्ले-ऑफ लढतीत भारतीय महिलांनी चीन संघाचा 2-0 असा पराभव केला. भारतीय महिला हॉकी संघातर्फे शर्मिला देवी व गुरजीत कौर यांनी पहिल्या सत्रात महत्त्वाचे गोल केले. अवघ्या 6 मिनिटांच्या अंतरात झालेले हे दोन गोल निर्णायक ठरले. शर्मिलाने 13 व्या तर गुरजीतने 19 व्या मिनिटाला गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला.
भारताचा 2-0 अशा फरकाने मिळवलेला विजय वरकरणी एकतर्फी भासत असला तरी प्रत्यक्षात दोन्ही संघांनी एकमेकांच्या बॉक्समध्ये सातत्याने आक्रमणे केली असल्याने उभय संघात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चुरस रंगत गेली. यादरम्यान, दोन्ही संघांनी गोल नोंदवण्याची उत्तम संधी निर्माण करण्याचा, पेनल्टी मिळवण्याचा सपाटा सुरु केला. पण, दोन्ही संघांना अपवाद वगळता या संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयशच आले.
पहिल्या सत्रातील भारताचे दोन गोल याचमुळे विशेष महत्त्वाचे ठरले. युवा फॉरवर्ड शर्मिलाने गुरजीतच्या वेगवान ड्रग फ्लिक फटक्यावर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. तिच्या या गोलमुळे भारताला पहिल्या क्वॉर्टरमध्ये 1-0 अशी आघाडी घेणे शक्य झाले. या आघाडीमुळे मनोबल उंचावणे साहजिक होते आणि याचा लाभ घेत भारताने आपली आघाडी 6 मिनिटांच्या कालावधीतच आणखी भक्कम केली. 19 व्या मिनिटाला गुरजीतने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले.
दुसरीकडे, चीनने भारताची आघाडी कमी करण्यासाठी हरसंभव प्रयत्न केले. काही पेनल्टी कॉर्नर मिळाल्याने त्यांना आक्रमणे चढवण्यात यश मिळाले. मात्र, भारतीय कर्णधार सविताने त्यांची आक्रमणे सातत्याने थोपवत भक्कम बचाव साकारला आणि यानंतर चीनकडे कोणताच पर्याय बाकी राहिला नाही.
10 मिनिटांच्या मध्यंतरानंतर चीनने तिसऱया क्वॉर्टरमध्ये भारतावर दडपण आणण्याचा बराच प्रयत्न केला. पण, भारतीय संघाची बचाव फळी अभेद्य राहिली आणि त्यांनी चीनचे प्रत्येक आक्रमण यशस्वीपणे परतावून लावले. तिसऱया क्वॉर्टरनंतर दोन्ही संघांनी बॉल पझेशनच्या आघाडीवर वर्चस्व गाजवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. चीनचा संघ यात अधिक आक्रमक होता. पण, या तिसऱया सत्राप्रमाणे चौथ्या व शेवटच्या सत्रात देखील चीनला अजिबात यश मिळाले नाही. या शेवटच्या सत्रात चीनने 3 सलग पीसी कॉर्नर्स मिळवले. मात्र, भारताच्या भक्कम बचाव तंत्रासमोर त्यांचा नाईलाज झाला.