प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पाणी गळती निवारणाकडे एलऍण्डटी कंपनीचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. परिणामी मोठय़ाप्रमाणात पाणी वाया जात आहे. लक्ष्मीटेकडी येथील दुभाजकजवळ जलवाहिनीला गळती लागल्याने मोठय़ाप्रमाणात पाणी वाया जात आहे. पण याची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आठ दिवसांपासून हजारो लीटर पाणी वाया गेले आहे.
शहरात बहुतांश ठिकाणी जलवाहिन्यांना गळत्या लागल्या असून दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विशेषतः व्हॉल्वमध्ये मोठय़ाप्रमाणात पाणी वाया जात असल्याने दुरुस्तीबाबत असंख्य तक्रारी करण्यात येत आहेत. पण याची दखल घेण्यात आली नाही. रामघाट रोडवर लक्ष्मी टेकडी परिसरात दुभाजकाजवळ लागलेल्या जलवाहिनी गळतीद्वारे गेल्या आठ दिवसांपासून पाणी वाहत आहे. याबाबत नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे असंख्य तक्रारी केल्या. पण याची दुरुस्ती करण्यात आली नाही. सलग पाणी वाहत असल्याने रस्त्यावर पाणीच पाणी होत असून वाहनधारकांच्या अंगावर पाणी उडत असल्याने याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या काही भागात सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे मुबलक पाणीपुरवठा केला जात नाही. दुसरीकडे गळती निवारणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सातत्याने पाणी वाया जावूनही रामघाट रोडवरील जलवाहिनीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील गळतीकडे वरि÷ अधिकारी लक्ष देतील का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.