पारंपरिक भारतीय शेतीला प्राधान्य
प्रतिनिधी /बेळगाव
सेंद्रीय शेतीद्वारे पीकविलेली उत्पादने विक्री करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गोकुळ ऑर्गेनिक इंटरनॅशनलच्या आऊटलेटचे सोमवारी थाटात उद्घाटन झाले. गोवावेस येथे सुरू झालेल्या या आऊटलेटचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस महासंचालक भास्करराव, कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील माजी विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, लेकव्हय़ू हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. सोनवलकर, गोकुळ ऑर्गेनिकचे संस्थापक चेअरमन हणमंतगौडा यांच्या हस्ते करण्यात आले.
केवळ भाजीपालाच नाही तर फळे, कडधान्य, बियाणे, डिटर्जंट या सह इतर साहित्य सेंद्रीय शेतीद्वारे पीकविलेल्या उत्पादनापासून तयार करण्यात आले आहे. या आऊटलेटमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, कडधान्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. पारंपरिक भारतीय शेतीला प्राधान्य देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. देशभरातील नागरिकांना चांगल्या दर्जाचा कृषी माल मिळावा व शेतकऱयाला चांगला पैसा मिळावा या उद्देशाने गोकुळ ऑर्गेनिकची सुरुवात करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष हणमंतगौडा यांनी स्वागतप्रसंगी सांगितले.
यावेळी बोलताना अतिरिक्त पोलीस महासंचालक भास्करराव म्हणाले, रासायनिक खताचा बेसुमार वापर वाढल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. ऑर्गेनिक शेतीमुळे नागरिकांना विषमुक्त भाजीपाला व कडधान्ये मिळणार आहेत. नागरिकांनी आपले आरोग्य सांभाळण्यासाठी ऑर्गेनिक शेतीद्वारे पिकविलेल्या उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. शंकरगौडा पाटील म्हणाले ऑर्गेनिक शेती ही भविष्यातील मोठी गरज आहे. मोठय़ा महानगरांमध्ये ऑर्गेनिक उत्पादने वापरली जात आहेत. यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे. तसेच शेतकऱयांना आपला कृषी माल थेट ग्राहकाला विक्री करता येणार असल्याने चांगले पैसे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी ऑर्गेनिक शेतीकडे वळावे, असे त्यांनी सांगून गोकुळ ऑर्गेनिकला शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती.