ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांची आर्थिक गैरव्यवहार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरुन ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआय यांच्या कारवाया खरे बोलणाऱ्यांच्या आणि भाजपाची सत्ता नसलेल्या ठिकाणीच होतात का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राऊत म्हणाले, नवाब मलिक किंवा आम्ही सातत्याने सत्य बोलत आहोत. जे सत्य बोलतात किंवा भाजपचे जिथे सरकार नाही तिथे ईडी, सीबीआय अशा तपास यंत्रणा मागे लावल्या जात आहेत. भाजपच्या लोकांसाठी ईडी नाही का? माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. मलिक कॅबिनेट मंत्री आहेत आणि ते सत्य बोलत आहेत, म्हणूनच त्यांना चौकशीसाठी नेले आहे. पण, मलिक संध्याकाळी घरी परततील. भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे, की 2024 नंतर चित्र वेगळे असेल. 2024 नंतर आम्हीसुध्दा तुमच्या मागे अशाच तपास यंत्रणा लावू, असा इशारा राऊत यांनी दिला.