उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका यथासांग पाडल्या आणि निकालाही हाती आला आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर निकालाच्या विश्लेषणांचे पेव फुटते असे आताही फुटले आहे. आपापल्या विचारसरणीनुसार प्रत्येक विश्लेषक या निकालांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यात नवे किंवा आश्चर्यकारक असे काही नाही. तथापि, काही विश्लेषणे अशी असतात की त्यांची दखल घ्यावी लागते आणि त्या विश्लेषणांचे विश्लेषणही करणे भाग पडते. यंदा उत्तर प्रदेशात भाजपचे काही खरे नाही. महागाई, बेरोजगारी, कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थलांतरितांचा प्रश्न, कोरोनाच्या दुसऱया उद्रेकात या राज्यात उडालेला हाहाकार, इत्यादी मुद्दे भाजपच्या विरोधात जातील. इतकेच नव्हे तर पक्षाला सत्ता गमवावी लागेल, असेही भाकित अनेक विचारवंत म्हणवून घेणाऱयांनी, विशेषतः युटय़ूबर्सनी केले होते. तसा प्रचारही तीन महिने जोराजोरात चालविला गेला. तेही एकवेळ ठीक म्हणता येईल. तथापि, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात भाजपला फटका बसला तर जुलैत होणाऱया राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत भाजपचे काय होईल याचीही दिवास्वप्ने (विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रियाही सुरु होण्यापूर्वी) रंगविली गेली. ‘बाजारात तुरी…’ या म्हणीसारखाच खरे तर हा प्रकार. पण तोही कसोशीने केला गेला. पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले असते. त्यानुसार मतगणनेचा दिवस मावळला आणि उत्तर प्रदेशातील सत्तांतराची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱयांच्या पदरी घोर निराशा पडली. स्वप्नभंगाचा हा धक्का निश्चितपणे जीवघेणा असणार. पण तो तसा बसल्याचे दाखविताही येत नव्हते. कारण प्रतिष्ठेचा प्रश्न होता. म्हणून आता वेगळय़ा प्रकारे या निकालांचा ‘अन्वयार्थ’ लोकांच्या गळी उतरविण्याचे कार्य सुरु आहे. त्यातील एक विश्लेषण असे आहे, की यावेळी उत्तर प्रदेशात बसप नेत्या मायावती सक्रीय नव्हत्या. त्यामुळे हा संघर्ष भाजप विरुद्ध सप असा द्विपक्षीय होता. त्यामुळे मतांची विभागणी झाली नाही, ती मतविभागणी झाली असती तर अखिलेश यादव यांचा पराभव झाला. अन्यथा उत्तर प्रदेशातील चित्र वेगळे दिसले असते, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. याची मोठी गंमत वाटली. कारण 2017 मध्ये जेव्हा याच राज्यात विधानसभा निवडणूक झाली, तेव्हाही भाजपला प्रचंड बहुमत मिळाले होते. त्यावेळी मायावती सक्रीय होत्या आणि त्यामुळे संघर्ष भाजप, सप-काँगेस युती आणि बसप असा त्रिकोणी होता. त्यावेळी भाजपच्या मोठय़ा विजयाचे कारण सप-काँगेस युती आणि बसप यांच्यात झालेली मतविभागणी हे सांगण्यात आले होते. म्हणजे यावेळी जे कारण दिले जात आहे त्याच्या ठीक उलट कारण सांगण्यात आले होते. ही मतविभागणी झाली नसती, तर सप आणि काँगेस युतीचा विजय झाला असता. ही मतविभागणी भाजपच्या पथ्यावर पडली असे अनेक विश्लेषकांनी त्यावेळी ठासून सांगितले होते. आता याला काय म्हणावे? भाजपचा विजय झाला तर त्याला इतर पक्षांमध्ये झालेली मतविभागणी हे कारण असू शकते, तसेच इतर पक्षांमध्ये न झालेली मतविभागणी हे देखील कारण असू शकते, असे कसे होऊ शकते? एकंदर, या पुरोगामी विचारवंतांची धन्य आहे, असेच म्हणावे लागते. थोडक्यात काय, तर कसेही उलट-सुलट बोला, परस्परविरोधी लिहा, पण भाजपला विजय मिळविण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नांचे आणि उत्कृष्ट नियोजनाचे श्रेय मात्र देऊ नका, असा हा पुरोगामी खाक्या आहे. यावर एवढेच सांगावेसे वाटते की एवढा एखाद्या पक्षाचा दुःस्वास बरा नव्हे. मतदार मूर्ख नसतो. त्याच्यासाठी त्याच्या समाधानाचे काहीतरी केल्याशिवाय तो सातत्याने एका पक्षावर किंवा नेत्यावर विश्वास टाकणार नाही. तेव्हा अशी निरर्थक विश्लेषणे हा मतदाराचाच अवमान ठरतो. आता या निवडणुकांनंतर आणखी एक प्रकार होत आहे. तो म्हणजे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान पदासाठी पंतप्रधान मोदींचा पर्याय म्हणून पुढे आणण्याचा आहे. केजरीवाल यांच्या पक्षाने पंजाबमध्ये देदिप्यमान विजय मिळविला आहे, यात संशय नाही. या विजयातून त्यांची क्षमता दाखवून दिली आहे. या विजयाची प्रशंसा करावी तितकी थोडी आहे. मात्र, लगेच सुतावरुन स्वर्ग गाठण्याचे कारण नसते. दहा महिन्यांपूर्वी ममता बॅनर्जींचा असाच भव्यदिव्य विजय पश्चिम बंगालमध्ये झाला होता. त्यानंतरचे काही आठवडे ममता बॅनर्जी पंतप्रधानपदाचा पर्याय होत्या. जणू काही आता केवळ त्यांच्या शपथविधीची वेळ ठरविणे बाकी आहे, अशी वातावरणनिर्मिती केली गेली. पण नंतर ही ममताप्रेमाची लाट ओसरली आणि शपथविधीपूर्वीच त्यांच्याकडून पंतप्रधानपदाचा राजीनामा घेण्यात आला. आता ही ‘बोलाच्याच पंतप्रधानपदा’ची माळ केजरीवाल यांच्या गळय़ात घालण्याचा कार्यक्रम काही आठवडे चालणार आहे. नंतर काहीतरी होईल आणि पुरोगाम्यांच्या या केजरीवाल प्रेमालाही ओहोटी लागेल. मग नव्या पर्यायाचा शोध घेण्यासाठी हेच पुरोगामी धावाधाव करतील. हा सारा मृगजळापाठी धावण्याचाच प्रकार आहे. लोक अशा प्रकारांकडे एक करमणूक म्हणून पाहतात. कारण कोणत्याही प्रस्थापित नेतृत्वाला पर्याय निर्माण व्हावा, लोकांची इच्छा असेल तरच तो पर्याय उभा राहतो. केवळ अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याने नव्हे. ज्यांचा लोकांशी संबंध तुटलेला आहे, अशा हस्तीदंती मनोऱयात वास्तव्य करणाऱया आणि कल्पनेची घोडी चालवून आपल्याला न आवडणाऱया नेत्याविरोधात काल्पनिक राजकीय लढाया जिंकणाऱया पुरोगाम्यांचे ते काम नव्हे. त्यांनी तसे समजूही नये, असे सुचवावेसे वाटते. लोकशाहीत कोणीही सदासर्वकाळ शिखरावर राहू शकत नाही, हे खरे असले खाली नुसती नाचानाची करुन त्याला शिखरावरुन उतरविताही येत नाही हे समजून घेणे आवश्यक आहे. संबंधित लोक त्यांच्याच पूर्वानुभवावरुन हे समजून घेतील अशी आशा आहे.
Previous Articleभारताचे क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानमध्ये
Next Article डिजिटल शॉपिंगमध्ये भारत दुसरा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.