पुनर्वसनचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
राधानगरी / प्रतिनिधी
न्यू करंजे, ता राधानगरी येथील बाबाजी सखाराम सुतार यांच्या गाईच्या वासराला रात्री 12 च्या सुमारास घराच्या पाठीमागील बाजूने बिबट्याने प्रवेश करून वासराला सुमारे दोनशे फूट अंतरावर नरडीचा घोट घेत वासराला जखमी केले. यावेळी कुत्र्याच्या व गाईच्या हंबरड्याने घरातील लोक जागे होऊन व माणसाची चाहूल लागताच बिबट्या भक्ष्य सोडून जंगलात पळून गेला, या घटनेमुळे या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यू करंजे हे गाव राधानगरी अभयारण्य क्षेत्रात येत असून या गावात काही नागरिकांनी ऐच्छिक पुर्नवसन केले आहे. तर काही नागरिक अद्याप पुनर्वसनाची रक्कम अथवा जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने 70 वर्षाहुन अधिक काळ पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत काही नागरिक तीथेच वास्तव्यास आहेत. गेली अनेक वर्षे जंगली हिंस्त्र प्राण्यांचे हल्ले वाढले आहे, वन्य प्राणी व मनुष्य याचा संघर्ष सतत या भागात सुरू आहे.
रात्री झालेल्या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाले असले तरी ही वेळा घरातील एखाद्या मनुष्यावर आली असती तर ? यामुळे वन विभाग व शासन पुनर्वसन करणार का ? असा प्रश्न येथील नागरिकांना सतावत आहे.