उष्म्यामुळे नागरिक हैराण, ग्रामीण भागातही पाऊस
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या आठ दिवसांपासून उष्म्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना मंगळवारी दुपारी जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. त्यानंतर बुधवारी दुपारीच ढगाळ वातावरण आणि पावसाचा काही ठिकाणी शिडकावा झाला. शहरात मात्र पाऊस झाला नाही. केवळ काही थेंब पडले आणि त्यानंतर पाऊस गायब झाला. त्यामुळे पुन्हा उष्म्यामध्ये वाढ झाली.
मार्च महिन्यातच वळिवाच्या आगमनाने सारेच हैराण झाले आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. बाजारपेठेतील भाजी विपेते आणि फेरीवाले यांचीही तारांबळ उडत आहे. कडक ऊन, त्यानंतर ढगाळ वातावरण आणि पाऊस पडत आहे. मात्र, यामुळे उष्म्यामध्ये वाढ होऊन सारेजण हैराण झाले आहेत. एप्रिलअखेर पाऊस झाला तर त्याचा फायदा शेतकऱयांना होऊ शकतो. मात्र, आता मार्च महिन्यातच पाऊस होत असल्यामुळे कडधान्य, जोंधळा पिकांचे नुकसान होत आहे.
सकाळपासूनच उष्मा जाणवत आहे. दुपारी ढग येऊन पावसाचा शिडकावा होत आहे. मंगळवारी ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. सध्याचे हवामान पाहता पुन्हा पाऊस होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जोंधळा पीक जोमात असताना हा पाऊस होत असल्याने जोंधळा काळा होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच काढून ठेवलेले कडधान्य पीकदेखील खराब होत आहे.