सांगली / प्रतिनिधी
जिल्हाभर रविवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.
खराडे म्हणाले रविवारी सांगली जिल्ह्यात मांजर्डे, हातनुर, जाखापुर, कुची सह अन्य काही भागात गारपीट झाली आहे. या गारपिटीमुळे छाटणी केलेल्या द्राक्ष बागांच्या काड्यांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी काड्या फुटल्या असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान होते. त्यामुळे छाटणी झालेल्या द्राक्षबागांवर गारपीट झालेल्या परिसरात पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. त्यासाठी कृषी विभागाला आणि तलाठ्यांना तातडीने पांचनाम्याचे आदेश द्यावेत.
याशिवाय पलूस येळावी परिसरातील अनेक शेतकऱ्याच्या द्राक्षबागेत अद्याप द्राक्षे आहेत. अशा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा द्राक्षबागांचेही पंचनामे आवश्यक आहे. सदर नुकसान द्राक्ष पीक विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना मिळत नाही. कारण सध्याच्या पीक विमा योजनेचा कालावधी मार्चपर्यंत असतो आणि जरी विमा योजनेच्या आठ महिन्यांच्या कालावधीत द्राक्ष बागेचे नुकसान झाले तरीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, कारण पीक विमा योजनेचे निकष हे कंपनी हिताचे आहेत, शेतकरी हिताचे नाहीत. त्यामुळे पीक विमा योजना सक्षम करण्याची गरज आहे.