परिवहन महामंडळाच्या बससेवेला उत्तम प्रतिसाद : प्रवाशांमधून समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहन महामंडळाने विमान प्रवाशांसाठी सुरू केलेल्या ‘रेल टू एअर’ बससेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मागील नऊ दिवसांत 600 प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेतला. खासगी वाहनांपेक्षा बसचा प्रवास किफायतशीर असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. विमानाच्या वेळेनुसार बससेवेच्या फेऱया वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.
रेल टू एअर या बसफेरीला गुरुवार दि. 2 जूनपासून प्रारंभ झाला. बेळगाव रेल्वेस्थानकापासून सांबरा येथील विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी बससेवा सुरू झाली. रेल्वेस्थानकापासून विमानतळापर्यंत 150 रुपये तर मध्यवर्ती बसस्थानकापासून विमानतळापर्यंत 100 रुपये तिकीट दर निश्चित केला आहे. प्रवाशांच्या बॅगा व इतर साहित्यासाठी बसमध्ये पुरेशी व्यवस्था केली आहे. सध्या नियमित पद्धतीने बसफेऱया सुरू आहेत.
सुरुवातील दिवसांतून चार वेळा असणारी बसफेरी आता पाच वेळा केली आहे. मागील नऊ दिवसांमध्ये 600 प्रवाशांनी या बसफेरीचा लाभ घेतला आहे. जसजशी प्रवाशांना माहिती होत जाईल, तसतशी प्रवासी संख्या वाढत जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच परिवहन मंडळाकडून प्रवाशांची प्रतिक्रिया लेखी स्वरुपात घेतली जात आहे.
वेळापत्रकाची गरज
प्रवाशांना बसफेरीबद्दल अधिकाधिक माहिती व्हावी, यासाठी जागृती होणे गरजेचे आहे. बसफेरी सुरू होऊन 10 दिवस झाले तरी अद्याप रेल्वेस्थानक व विमानतळावर याचे वेळापत्रक नाही. त्यामुळे प्रवाशांना बसफेरीची माहिती होत नसल्याने ते खासगी वाहतुकीचा वापर करीत आहेत. त्यामुळे वेळापत्रक लावण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.