परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची घोषणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात लवकरच ई-पासपोर्टची सुविधा सुरू होऊ शकते. या सुविधेमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास आणि सुरक्षा व्यवस्थाही सुधारेल. याशिवाय पोलिस पडताळणीसाठी लागणारा वेळही कमी लागणार असून, त्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरू असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी जाहीर केले. भारताचा ई-पासपोर्ट अमेरिका-ब्रिटनप्रमाणे पूर्णपणे सुरक्षित आणि अद्ययावत असणार आहे. साहजिकच भारतीय नागरिकांच्या विदेश दौऱयांसाठी त्याचा सुलभपणे वापर होऊ शकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
24 जून हा पासपोर्ट सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार नव्याने उपलब्ध होणारी ई-पासपोर्ट सुविधा ओळख चोरीपासून संरक्षण आणि डेटा सुरक्षा भक्कम करणार आहे. पासपोर्ट सुविधा आणखी कार्यक्षम करण्यासाठी भारत लवकरच ई-पासपोर्ट सुविधा सुरू करणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पासपोर्ट संघटनेच्यावतीने या सुविधेवर सध्या काम सुरू आहे. भारतातील नागरिकांना वेळेवर, विश्वासार्ह, सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम रीतीने पासपोर्ट आणि इतर अनेक पासपोर्ट संबंधित सेवा प्रदान करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार याप्रसंगी करण्यात आला.
कागदविरहित दस्तऐवज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पासपोर्ट सेवा प्रणाली देखील डिजिटल प्रणालीशी जोडण्यात आली आहे. मंत्रालयाने पोस्ट विभागाच्या सहकार्याने 228 पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंदे चालवली आहेत. या सेवेमुळे पासपोर्ट सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस पडताळणीचा वेळ वाचणार
सरकार नागरिकांसाठी पासपोर्ट नियम आणि प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. पासपोर्ट वितरण इकोसिस्टम अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी, पोलीस पडताळणीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी मंत्रालय राज्य/केंद्रशासित प्रदेश पोलिसांसोबत सतत काम करत आहे. एम-पासपोर्ट पोलीस ऍपचा वापर 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 8275 पोलीस ठाण्यांमध्ये केला जाईल. या सेवेमुळे पोलीस पडताळणीचा वेळ कमी होणार असल्याने तातडीने पासपोर्ट मिळू शकतो, असेही सांगण्यात आले.