आल्तीनो-सांतीनेज रस्त्याची व्यथा ; खात्यांतर्गत असमन्वयातून कोटय़वधींची उधळपट्टी
प्रतिनिधी /पणजी
सांतीनेज-आल्तिनो रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण होऊन पुरता महिनासुद्धा उलटण्यापूर्वीच त्याच्या नरडय़ाला नख लावण्याचे कृत्य करताना वीज खात्याने दोन ठिकाणी रस्ता फोडून टाकल्याचे समोर आले आहे. खात्यांतर्गत समन्वयाच्या अभावातून झालेल्या कामांमुळे सरकारी खाती कशाप्रकारे जनतेच्या पैशांची कशी उधळपट्टी करतात त्याचे हे ज्वलंत उदाहरण ठरले आहे.
सुमारे सात वर्षांपूर्वी या रस्त्याचे हॉटमिक्सिंग करण्यात आले होते. त्यावेळीही काही दिवसांनीच ऑप्टिकल फायबर केबल घालण्यासाठी दोन्ही बाजूनी सदर रस्ता फोडण्यात आला होता. त्याशिवाय नंतरच्या काळात अनेक ठिकाणी त्याचे लचके तोडण्यात आले. परिणामी सदर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः निकामी ठरला होता. अखेरीस दोन महिन्यांपूर्वीच त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात आले होते.
परंतु वाहनचालकांनी समाधानाचा सुस्कारासुद्धा सोडण्यापूर्वीच सदर रस्ता वीज खात्याच्या नजरेत खुपला आणि उच्च दाबाची भूमीगत केबल टाकण्याच्या नावाखाली तो दोन ठिकाणी फोडून टाकण्यात आला. दोन्ही ठिकाणी खणलेली खोल चरी आता पुन्हा वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
आल्तीनो येथील वीज उपकेंद्राचे नुतनीकरण हाती घेतल्यास सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. त्यामुळे वीज खात्यास कुठून कुठे भूमीगत वीज केबल न्यायचे आहेत व कुठे कुठे रस्ते फोडावे लागतील याची पूर्ण कल्पना होती. तरीही रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण पूर्ण होईपर्यंत ते डोळ्यांवर झापड ओढून गप्प राहिले व त्या डांबराने रस्त्याला धड पकड सुद्धा घेण्यापूर्वीच स्वतःचे कामगार लावून रस्ता खोदून टाकला.
आता दोन्ही ठिकाणी भल्यामोठय़ा चरी निर्माण झाल्या असून गत महिन्याभरात तब्बल चार वेळा दुरुस्ती करण्यात आली तरीही त्या आपले अस्तित्व कायम ठेऊन आहेत. आश्चर्यकारक प्रकार म्हणजे वीज आणि साबांखा या दोन्ही खात्यात स्वतःला ’अभियंते’ म्हणवणारे उच्च शिक्षित कर्मचारी असतात. परंतु हॉटमिक्स रस्त्याची दुरुस्ती मातीने किंवा सिमेंट कॉक्रिटने होणे शक्य नाही याचे साधे सामान्यज्ञान सुद्धा त्यांना नसावे याबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
डांबरी रस्त्यांची माती-काँक्रिटने दुरुस्ती?
सदर दोनपैकी एका चरीची दुरुस्ती मातीने करण्यात येते तर दुसऱया मोठय़ा चरीची दुरुस्ती सिमेंट काँक्रिटने करण्यात येत आहे. परंतु डांबर आणि सिमेंट किंवा माती यांचा कोणत्याही प्रकारे संयोग होत नाही व दुसऱयाच क्षणी सर्व श्रमांवर पाणी फेरले जात आहे. सर्वात भयानक प्रकार म्हणजे काँक्रिटमध्ये वापरण्यात येणारी खडी आणि मातीतील दगड सर्वत्र विखरून पडते. त्यामुळे खास करून दुचाकी चालकांसाठी अपघातप्रवण जागा बनल्या आहेत.
प्रधान अभियंते जबाबदारी स्वीकारतील का?
यापूर्वी दोनापावल येथील राजभवन प्राकारात बांधण्यात आलेल्या सभागृहाच्या उत्कृष्ट बांधकामासाठी साबांखाचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला होता. आता राजधानीतील एकानएक रस्त्यांची पहिल्याच पावसात वाताहत, दैना, दुर्दशा झाली आहे. साबांखाच्या कंत्राटदारांनी केलेल्या या भ्रष्टाचारामुळे कोटय़वधी रुपये शब्दशः पाण्यात गेले आहेत. त्याप्रकरणी वर्तमानपत्रे आणि सामाजिक माध्यमांवरून साबांखाची लक्तरे वेशीवर टांगत आहेत. तरीही गेंडय़ाची कात पांघरलेल्या अधिकाऱयांना काहीच पडून गेलेले नाही, असेच दिसत आहे. या सर्वांची जबाबदारी पार्सेकर घेतील का? असा सवाल निर्माण झाला आहे.
राजधानीतील जवळजवळ सर्वच रस्ते पावसापूर्वी एक दोन महिने आधी हॉटमिक्स करण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसात या डांबरीकरणाने कंत्राटदारांचा काळाकुट्ट भ्रष्टाचार उघडा पाडला. पाऊस पडतो न पडतो तोच बहुतांश रस्त्यांवरील खडी उखडली गेली. त्या अन्यत्र साचल्यामुळे सर्वत्र छोटय़ा टेकडय़ा तयार झाल्या. त्यातून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले व त्यात पाणी साचल्यामुळे परिणामस्वरूप वाहन चालक आणि खास करून दुचाकीचालकांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत.
बाबूश मोन्सेरात संतप्त
दरम्यान, अशाप्रकारे राजधानीतील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेसाठी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना दोष देऊ लागले आहेत. त्यांच्यावर निक्रियतेचा ठपका बसू लागला आहेत. त्यातून त्यांना जनतेच्या रोषास तोंड द्यावे लागत आहे. अखेरीस बाबूश यांना तोंड उघडावेच लागले व आज त्यांनी संतप्त स्वरात सरकारला घरचा अहेर दिला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना खरमरीत पत्र लिहून त्यांनी स्वतःच्या संतापास वाट करून दिली आहे. केवळ तीन महिन्यांपूर्वीच हॉटमिक्स करण्यात आलेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसात वाताहत झाल्याचे निदर्शनास आणून देत याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.