काल आषाढी एकादशीला सर्व वारकरी वैष्णव पंढरपूरला पोहोचले. आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला पंढरपूरमध्ये विशेष महत्त्व आहे. कार्तिके तु सीते पक्षे एकादश्यां विशेषतः । पूजयेत गोपवेषां तं पांडुरंगे स्थितं हरिम ।। या श्लोकानुसार आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भगवंत मूळ नंदनंदन, यशोदानंदन, गोपाळ असतात. या दिवशी ते मूळ ‘गोपभावात’ असतात. त्यावेळी ते पूर्णपणे वृन्दावनवासी जनांचे चिंतन करीत असतात. म्हणूनच या एकादशीच्या दर्शनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या भगवान श्रीकृष्णाच्या बाल्यलीलांचा आनंद अनुभवण्यासाठी सर्व वैष्णव चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आनंदाने कीर्तन-नर्तन करतात. तुकाराम महाराज या सुंदर सोहळय़ाचे वर्णन करताना म्हणतात, खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायी रे ।।1।। नाचती आनंदकल्लोळी । पवित्र गाणे नामावळी रे । कळिकाळावरी घातली कास । एक एकाहुनी बळी रे ।।2।। गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा । हार मिरवती गळा रे । टाळ मृदंग घाई पुष्पांचा वरुषाव । अनुपम्य सुखसोहळा रे ।। 3।। लुब्धली नादी लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां रे । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्ध साधकां रें ।। 4।। वर्णाभिमान विसरली याती । एक एका लोटांगण जाती रे । निर्मळ चित्ते झाली नवनीते । पाषाणा पाझर सुटती रे ।।5।। होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ।।6।। अर्थात ‘या वैष्णवाने चंद्रभागेच्या वाळवंटात श्रीहरीच्या भजनाचा खेळ मांडला आहे. त्यांनी क्रोध आणि अभिमान वगैरे विकारांना पायाखाली दाबून टाकले आहे (त्यावर विजय प्राप्त केला आहे) आणि नम्रतेने एकमेकांच्या पाया पडत आहेत. श्रीहरीच्या पवित्र नामानंदामध्ये ते तल्लीन होऊन नाचत आहेत, एकापेक्षा एक असे हे बलवान वैष्णव कळिकाळावरही मात करत आहेत. त्यांनी सर्वांगाला गोपीचंदनाची उटी लावली आहे आणि गळय़ामध्ये तुळशीच्या माळा आणि फुलांचे हार घातले आहेत. टाळ, मृदंग यांचा घोष होत आहे आणि पुष्पांचा वर्षाव होत आहे, अशा या सुखसोहळय़ाचे वर्णनही करता येत नाही. या दिव्य नादब्रह्माला लुब्ध होऊन मूढ जनासहित, स्त्रिया, पंडित, ज्ञानी, योगी, सिद्ध, साधक, महानुभाव अशा सर्वानाच समाधी लागली आहे. हे वैष्णव आपल्या जाती वर्णाचा अभिमान विसरून एकमेकांना लोटांगण घालीत आहेत. यामुळे त्यांचे चित्त लोण्याहूनही मऊ आणि शुद्ध झाले आहे, त्यांच्या संगतीने पाषाणहृदयी मनुष्यालासुद्धा भगवत्प्रेमाचे पाझर फुटते. हरिनामाच्या जयजयकाराने आकाशात प्रतिध्वनी उमटत आहेत, यांनी वैष्णववीर भक्तीसुखाने मत्त होऊन भवसागर तरून जाण्यासाठी पायवाट सोपी केली
आहे.’
अशा प्रकारे आषाढी एकादशीला पांडुरंगाचे बाळकृष्ण रूपात दर्शन घेतल्यावर आनंदाने सर्व लोक गोपाळपुरा येथे ‘गोपाळ काला’ या उत्सवासाठी जमतात. वर्षातून दोनदा म्हणजे आषाढ पौर्णिमेला आणि कार्तिक पौर्णिमेला तनमनाने सारे भाविक एकत्र होतात. विठ्ठलनामाचा, गोपाळकृष्णाचा जयघोष करतात. दिंडय़ा पालख्या घेऊन वारकरी एकत्र येतात. कीर्तन करतात. अशी श्रद्धा आहे की, जेव्हा रुक्मिणी आणि कृष्णाची भेट झाली, तेव्हा उंच पर्वतावर त्यांनी मोठय़ा उत्सवाचे आयोजन केले. त्यात सखे-भक्त आपापली शिदोरी घेऊन आले आणि याच एकत्र जेवणाच्या समारंभाला ‘काला’ म्हणतात. असा हा आनंदोत्सव गोपाळपूर येथे साजरा होतो. गोपाळपूर हे पंढरपूरपासून दक्षिणपूर्व दिशेस दीड कि. मी. अंतरावर आहे. गोपाळपूरचे मंदिर हे एका टेकडीवर आहे. या टेकडी अथवा पर्वतास गोपाळपूर पर्वत म्हणून संबोधतात आणि हा पर्वत म्हणजे गोवर्धन पर्वत आहे. गोपाळपूर येथे मंदिराच्या पवित्र अशा गर्भगृहात गोपाळकृष्णाची वेणू वाजवणारी अत्यंत मनमोहक अशी मूर्ती आहे. श्रीकृष्णाच्या दोन्ही बाजूस पंखा घेऊन उभ्या असलेल्या गौळणी असून खाली गाय आणि वासरांच्या मूर्ती आहेत. गोपाळपूर हे अत्यंत पुण्यकारक आहे. श्रीकृष्ण रुक्मिणी देवीच्या शोधाकरिता गाई गोपाळांसह प्रथम याठिकाणी आले. येथे भीमा आणि पुष्पावती या नद्यांचा संगम असल्यामुळे ही परम पवित्र अशी जागा असून गोपाळांना राहण्या खेळण्यासाठी उत्तम आहे. असे पाहून गाईगोपाळांसह श्रीकृष्ण येथे क्रीडा करू लागले. येथेही भगवंताने गोपाळांसह काला केला आहे. भागवतशात्रामध्ये वर्णन येते की ‘श्रीविठ्ठल वेणू वाजवून संतुष्ट होणारे आहेत. दहीभाताची आवड असणारे आहेत. शत्रुविजयी आहेत, भीमा आणि पुष्पावतीच्या संगमावर राहणाऱया गाई गोपाळांचे चित्त रंजविणारे, विटेवर उभे, भक्तास वश होणारे, भक्तवत्सल असे पांडुरंग (श्रीकृष्ण) येथे तीन रूपांनी विराजमान आहेत. आल्हाददायक वेष असणारे, धष्टपुष्ट गायीसह गोकुळात येणारे, गायीच्या हंबरण्याने संतुष्ट होणारे, गौमाता ज्यांचे पाय चाटते असे हे श्रीविठ्ठल आहेत. ‘श्रीविठ्ठल हे मूलतः वृन्दावनातील श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्णाचे गाई, गोपाळावर अतिशय प्रेम आहे. त्यांच्याबरोबर वृन्दावनातील गोपाळ गौळणी गायी आणि इतरजन अनेक प्रेमाचे आदानप्रदान करतात. श्रीकृष्णाचे आपल्या भक्तांवर किती प्रेम आहे हे ते अशा खेळकर लीलाद्वारे दर्शवितात. संत तुकाराम महाराज अशाच एका दिव्य गोपाळकाल्याचे वर्णन करताना म्हणतात काल्याचिये आसे । देव जळी झाले मासे । पुसोनिया हांसे । टिरीसांगाते हात ।। 1।। लाजे त्यांसी वांटा नाही । जाणे अंतरीचे तेंही । दिन होतां कांही । होऊ नेदी वेगळे ।। 2 ।। उपाय अपाय यापुढे । खोटे निवडीता कुडे । जोडुनियां पुढे । हात उभे नुपेक्षी ।। 3 ।। ते घ्या रे सावकाशे । जया फावेल तो तैसे । तुका म्हणे रसे । प्रेमाचिया आनंदे ।। 4।। अर्थात ‘श्रीकृष्णांनी केलेल्या काल्यातून उरलेले उच्छिष्ट मिळावे म्हणून स्वर्गातील देव यमुनेच्या पाण्यात माशांची रूपे घेऊन राहिले. त्यावेळी कृष्णाने व गोपाळांनी काला खाऊन हात आपल्या कपडय़ाला पुसले. जो कोणी लज्जित होईल, त्याला शिदोरीचा वाटा मिळणार नाही. नम्रतेने श्रीकृष्णाकडे गेल्यास तो स्वतःपासून वेगळे करत नाही. या श्रीकृष्णाकडे यज्ञादी उपाय चालत नाहीत. तो खऱयाखोटय़ाची निवड करतो. त्याच्यापुढे जो नम्र होतो, हात जोडून उभा राहतो त्यांची तो उपेक्षा करीत नाही. ज्याला जे श्रीकृष्णाकडून मिळेल ते त्याने समाधानाने ग्रहण करावे व प्रेमरसाच्या आनंदात राहावे.’ अशा या अतुलनीय आध्यात्मिक आनंदाचा हा उत्सव साजरा करुन आपल्या दररोजच्या जीवनात अनुभवण्याचा आणि श्रीकृष्णभक्तीचा दृढनिश्चय करून सर्व वारकरी आपापल्या घरी परततात.
-वृंदावनदास