प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांची माहिती : कोल्हापूर दौऱ्यात स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्यात आगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताकदीने उतरणार आहे. या सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱयांनी कामाला लागावे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी दिली.
अभ्यंकर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात त्यांनी मनसेची भूमिका मांडली. ते म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाची पुनर्बांधणी सुरू आहे. पक्ष बळकट करण्याबरोबरच आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात मनसेचे नेते राज्यातील सर्व जिल्हय़ातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. बैठका घेऊन मार्गदर्शन करत आहेत.
दरम्यान, शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत अभ्यंकर यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ातील मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन केले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ांची जबाबदारी पक्षाने माझ्याकडे सोपविली आहे. या दोन्ही जिल्हय़ात मनसेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेण्याची गरज आहे. कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी सज्ज व्हावा, असे आवाहनही अभ्यंकर यांनी कार्यकर्त्यांना केले. बैठकीला संपर्क प्रमुख जयराज लांडगे, माजी आमदार परशुराम उपरकर, दिलीप धोत्रे, योगेश खैरी, हेमंत संभुश यांच्यासह स्थानिक माजी नगरसेवक राजू दिंर्डोले, जिल्हाध्यक्ष विजय करजगार, गजानन जाधव, नागेश चौगले, राजू जाधव, पुंडलिक जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.