ही घटना बिहारमधील सहरसा जिल्हय़ातील आहे. येथील एका युवकाने आपल्या पत्नीवर आपल्याला धोका दिल्याचा आरोप दाखल केला आहे. युवकाचे म्हणणे असे आहे, की पत्नीला सरकारी नोकरी मिळाल्याबरोबर ती आपल्याला विसरली आहे. तिला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी त्याने पंधरा लाख रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. मात्र आता तिने विश्वासघात केला असून ती भेटायलाही नाकबूल आहे, असे या युवकाचे म्हणणे आहे.
या दोघांची ओळख ते ज्या मैदानात सकाळी धावायला जात असत, तेथे झाली. काही दिवसानंतर ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. तरुणी पोलिसात नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्यासाठी व्यायामाचा सराव करण्यासाठी त्या मैदानात येत होती. नोकरी मिळविण्यासाठी या युवकाने आपल्या त्या प्रेयसीसाठी बराच पैसा खर्च केला. अखेरीस दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर दोन महिन्यात तिला पोलिसाची नोकरी मिळाली. त्यानंतर ती नोकरीच्या ठिकाणी गेली आणि या युवकाशी बोलणे तिने बंद केले. तिला शोधण्यासाठी तो तिच्या नोकरीच्या ठिकाणी समस्तीपूर येथे गेला. पण तिने त्याला ओळखण्यासही नकार दिला. त्यामुळे त्याला प्रचंड धक्का बसला असून आपल्याला वेड लागेल की काय, असे वाटत आहे, असे तो म्हणतो. त्याने आपल्याकडील सर्व पैसा तिच्या नोकरीसाठी खर्च केला होता. आता पैसाही गेला आणि पत्नी विचारेनाशी झाली. आता जगायचे तरी कसे? असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला आहे. न्यायासाठी तो हरप्रकारचे प्रयत्न करीत आहे. पत्नीच्या अधिकाऱयांनाही भेटून त्याने आपली अडचण सांगितली आहे. तथापि, अद्याप त्याला दाद मिळालेली नाही. युवतीने हे लग्न मान्य करायलाच नकार दिला आहे. त्याने सरकारदरबारी सगळीकडे अर्ज केले आहेत. तथापि, त्याचे ऐकून घेण्यास कोणीही तयार नाही. यातून धडा असा की प्रेमातही व्यवहार विसरून चालत नाही.