वाठार किरोली/वार्ताहर
सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. तसेच सातारा जिल्हा परिषदेने राज्य व देश पातळीवर स्वच्छतेत पुरस्कार मिळवले आहेत. पंचायत राजमध्ये राज्य पातळीवर नाव केले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचा कारभार पाहण्यासाठी व कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील गावाने राबवलेल्या योजनांची व त्या गावच्या कारभाराची घेण्यासाठी माहिती जम्मू – काश्मिरमधील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी आज भेट दिली.
नागझरी ता. कोरेगाव जि. सातारा येथील गावात ४० सिमेंट बंधारे, २०० माती बंधारे,३५ जाळी बंधारे ,४ पाझर तलाव,१५०० एकर डिप सीसीटी अशी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर करून तब्बल १ टीएमसी पाणी साठा केला आहे.
खऱ्या अर्थाने पाणीदार गाव झाले प्रचंड पाणीसाठा असल्याने या बागायती गाव २५ हजार टनांपर्यंत ऊसाचे तर कोट्यवधी रुपयांचे आले पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. शक्य तिथे बंधारे, जाळीचे बंधारे, तळ्यांचे खोलीकरण , मोठ्या प्रमाणावर झाडे लावून केलेल्या कामाची महती प्रत्यक्ष भेट देऊन पाहिली पाहिजे. टीसीएल चा योग्य वापर झाला नाही तर पाणी शुद्ध होण्या ऐवजी अपायकारक ठरते, हे लक्षात आल्याने विहिरीत पाईपलाईनला योग्य प्रमाणात अँटोमँटीक क्लोरीन मिळणारे मशीन जोडून खर्चाची बचत आणि अगदी शुद्ध पाणी पुरवठा करून गावाच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.
प्रगतीच्या टप्प्यात असलेल्या नागझरीच्या सर्वांगिण विकासासाठी बाबासाहेब कल्याणी ग्रुपचे आर्थिक सहाय्य, मदत, मार्गदर्शन, सहकार्य मिळू लागल्याने साऱ्या गावात पेव्हर्स, परीपूर्ण शिक्षणासाठी सुसज्ज शाळा लक्षवेधी ठरली आहे. पथदिवे,पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालयासाठी सौर ऊर्जेचा वापर केला आहे. गावात १९९७ मध्ये केलेली दारुबंदी आजही कायम आहे. नियमाप्रमाणे कमीत कमी पाणीपट्टी आणि घरपट्टी कमी असणारे हे गाव आहे.गावात शेती पूरक व्यवसाय साठी सोसायटी मार्फत त्वरित कर्ज पुरवठा केला जातो. अंगणवाडी, प्राथमिक शाळा सोलरयुक्त करून पूर्ण डिजिटल केले आहे. ५०० शोष खड्डे तयार करून सांडपाणी व्यवस्थापन केले आहे.तसेच एक गाव एक पाणवठा तसेच एक गाव एक स्मशानभूमी सर्व जाती धर्मासाठी खुली आहे.
गावात शेती पूरक व्यवसाय साठी सोसायटी मार्फत त्वरित कर्ज पुरवठा केला जातो. भविष्यात गायरान जमीनीवर सोलार शेती करून महावितरणच्या झंझटीतून सारा गाव मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीची धडपड सुरू आहे.१०० टक्के सोलर वापर करणारे गाव म्हणजे नागझरीची ओळख लवकरच होण्याचा टप्पा जवळ आला आहे.
गाव तसे धार्मिक असल्याने सर्व मंदिराचा जीर्णोद्धार करून टाकली आहेत. गावातील विवाहासाठी मोफत मंगल कार्यालयाची सोय केल्याने प्रत्येक कुटुंबातील विवाह थाटामाटात पार पडतो. सांडपाण्याची परफेक्ट नियोजन केल्याने गावात मच्छर नसल्याने खऱ्या अर्थाने डासमुक्त गाव आहे सुद्धा.
अशा भविष्याचा वेध घेत उपक्रम, योजना राबविण्यात आलेल्या या गावाची ओळख आता बदलू लागली आहे.
गावात सर्वाधिक सिमेंट क्राँक्रीटच्या घरे तर गावच्या विविध कार्यकारी सोसायटीने शेतकरी निवास या बाबीतून तब्बल १०० इमारतींना कर्ज पुरवठा करण्याचा जणू विक्रम केला आहे.
याच गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच असलेले आणि १९९७ पासून गावाचे नेतृत्व करणारे जितेंद्र भोसले यांनी तर गावातील ३०० हून अधिक गरजू मुलांना विदेशात नोकरीसाठी मदत केली आहे.आज सरपंच परिषद, पुणे चे राज्याध्यक्ष म्हणून सक्षमपणे जबाबदारी संभाळतात.गावात सक्षम नेतृत्व असलेल्या सरपंच जितेंद्र भोसले यांच्या सोबत जेष्ठ नागरिक, महिला, युवकांची साथ लाभली असल्याने नागझरी पँटर्न भविष्यात अधिकाधिक लोकाभिमुख होत जाईल.
सारे गाव आता बागायतदार म्हणून ऊस,आले, भाजीपाला, अन्नधान्य उत्पादन करण्यात आघाडीवर आहे.विदेशी चलन गावात आणणारा युवक वर्ग मोठ्या संख्येने असल्याने सर्वांगिण लौकिक असे गाव म्हणून नागझरी गावाची ओळख निर्माण झाली असल्याने गाव पाहण्यासाठी राज्यभरातून लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्त्यांची रोज वर्दळ वाढू लागली आहे.
लोकप्रतिनिधी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील,माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्री. छ.उदयनराजे भोसले,माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या सह जिल्हा नियोजन समिती कडे योग्य कामासाठी अर्थसाह्य मिळवण्यासाठी पाठपुरावा , त्याला लोकसहभागाची साथ आणि उपलब्ध शासकीय अनुदानाची जोड देत जी काही केलेली कामे आहेत, ती पाहणारे अचंबितचं होतात. आता हाच नागझरी पँटर्न समजून घेतला तर तो महाराष्ट्राला दिशादर्शक होऊ शकतो..! प्राचार्य विजय जाधव- पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, सातारा.