खासदार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन
प्रतिनिधी/ सातारा
सण उत्सव साजरे करण्याची साताऱयाला मोठी परंपरा आहे. ती आपण पाळत आलो आहोत. गेली दोन वर्षे आपल्याला गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. आता हा उत्सव आनंदात, उत्साहात साजरा करायचा आहे. कोणतेही गालबोट लागणार नाही अशा पध्दतीने आनंदाने हा गणेशोत्सव साजरा आपण सगळ्यांनी मिळून साजरा करूयात, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले. दरम्यान, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोणतेही विघ्न येईल असे कृत्य करू नये, तर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी ही नियम पाळून उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.
अलंकार हॉलमध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सह पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, सातारा प्रांत मिनाज मुल्ला, मुख्याधिकारी अभिजित बापट, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, गेली दोन वर्षे हा सण साजरा करता आला नव्हता. आता मात्र आपल्याला सण साजरा करायचा आहे. आम्हाला आनंदात नाचायच आहे. मी काल एका लग्नात गेलो होतो. एक मुलगा नाचत होता. असे उदाहरण ते म्हणाले, देखावे साजरे करायला आपल्याला खूप वाव आहे. लोकमान्य टिळकांपासून नागनाथ अण्णा नायकवडी यांच्यापर्यत करू शकता. मी ही 1948 पासून सचिव गणेशोत्सव मंडळाचा सचिव होतो. मला ही माहिती आहे. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागू देऊ नका. कुठं डेसिबल म्हणता, कोरोना काळात लस घेतले त्यांना ही कोरोना झाला असे सांगत त्यांनी नो कमिटी तर कमिटमेंट करूयात, आपण सारे एक आहात. परंपरा सांभाळुयात, चांगल्या कामाचे कौतुक करा, आनंदाने हा गणेशोत्सव साजरा करूया, असे आवाहन त्यांनी केले.
साताऱयाची परंपरा कायम ठेवा
जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी म्हणाले, या महिन्यात सणांची पूर्ण श्रृंखला आहे. मी या जिह्यात येण्यापूर्वी विदर्भ मराठावाडा येथे 13 वर्ष काम केले. तेथे साताऱयाबदल बरेच ऐकले आहे. देशात तणाव होता तेव्हा सातारा शांत होता. जसे शांत सातारा नाव आहे ते कायम ठेवा. येणारा सण सगळ्यासाठी आहे. आपल्यामुळे दुसऱयाला विघ्न होईल असे कृत्य करू नका, ज्या गोष्टीसाठी शासनाने नियम दिले आहेत. ते पाळावेत, असे सूचना त्यांनी केल्या.
शिस्त व नियम पाळत उत्सव साजरा करा
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, डॉल्बी हा लहान विषय आहे. गणपती मंडळ उत्सव साजरा करताना स्वतःची जबाबदारी आहे तशी प्रशासनाची जबाबदारी आहे. दरवर्षी शिस्त असते. रोडवर मंडप उभा करताना एक तृयीयांश जागा ठेवा. जसे काल कोयता घेऊन काही जण नाचले त्यामुळे सर्व प्रोग्रामची नाचक्की झाली. तसे करू नका. महिला सुरक्षित राहू शकते का तर नाही. म्हणजे तुम्ही पण चुकत आहात आणि आम्ही ही. काळजी घेतली पाहिजे. हा उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा केला पाहिजे. कायद्यानुसार साजरे करा. देखावा करताना पोलिसांचे लक्ष असणार आहे. चांगला मेसेज द्यावा, पण ते करताना दुसऱया व्यक्तीच्या भावना दुखावल्या नाही पाहिजेत. ध्वनी प्रदूषण झालं नाही पाहिजे. आमची कुठं भावना नाही की केस झाली पाहिजे, आमच्याकडे तेवढा वेळ नाही,पण शिस्त पाळणे महत्वाचे आहे, असे ही त्यांनी सांगितले.
सूचनांचा पाऊस अन टाळ्या
सूचना मांडण्यास अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांनी सांगताच अविनाश कदम यांनी डेसीबलची मर्यादा काय आहे? त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले. प्रकाश शेटे यांनी वाद्य वाजण्यास रात्री 12 पर्यत परवानगी द्यावी, अशी विनंती केली. नरेंद्र पाटील यांनी डॉल्बीच्या दोन बेस आणि दोन टॉपला परवानगी मागितली. धनंजय जांभळे यांनी खड्डे भरण्याची मागणी केली. ऍड. विनीत पाटील डेसीबलच सँपल कसं करणार से सांगा, अशी विनंती केली. शरद जाधव यांनी वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडला. पूजा बनसोडे यांनी अतिक्रमणे तळ्याच्या परिसरातील काढावी अशी विनंती केली. यामधील काही सूचनांना टाळ्या पडल्या.
अचानक वातावरण बदलले
हिंदुत्ववादी संघटनेचे हेमंत सोनवणे यांनी अफझल खान वधाचा देखाव्याचा मुद्दा मांडला तर भाजपचे संतोष प्रभुणे यांनी तोच मुद्दा उचलून धरला.गणेश दुबळे यांनी मात्र शासकीय कार्यलयात गणपती बसवू नये, डॉल्बी वाजवू नये, लोकांना त्रास होतो असा मुद्दा उपस्थित करताच प्रभुणे चिडले अन् वातावरण तणावाचे बनले. दोघांनाही पोलिसांनी शांत केले.
डेसिबलची बैठकीतच तपासणी
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी डेसिबलची तपासणी सभागृहात करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बैठकीच्या ठिकाणी 71 डेसिबल तर डॉल्बीच्या ठिकाणी 85 भरले. त्यानुसार गणेशोत्सव काळात ही तपासणी करण्यात येईल, जो नियम मोडेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.