भारत, पाकिस्तानसह अ गटातून लढणार, प्रत्यक्ष स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ, श्रीलंका-अफगाण यांच्यात सलामीची लढत
मस्कत-ओमान / वृत्तसंस्था
आगामी आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी हाँगकाँगने पात्रता संपादन केली असून ते भारत, पाकिस्तान या बलाढय़ संघांसह अ गटातून आव्हान उभे करतील. यंदाची आशिया चषक स्पर्धा उद्यापासून (शनिवार, दि. 27) खेळवली जाणार असून श्रीलंका-अफगाणिस्तान यांच्यात सलामी लढत होईल.
मस्कत-ओमानमध्ये पार पडलेल्या आशिया चषक पात्रता फेरीत हाँगकाँगचा संघ अपराजित राहिला असून त्यांनी आपले तिन्ही सामने सहज जिंकले. बुधवारी उशिरा खेळवण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात त्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. संयुक्त अरब अमिरातला 20 षटकांचा कोटा पूर्ण करण्याआधीच सर्वबाद 147 धावांवर समाधान मानावे लागले.
हाँगकाँगने धावसरासरीच्या निकषावर आपण मागे राहणार नाही, याची काटेकोर दक्षता घेत 19 व्या षटकात विजयाचे लक्ष्य पार केले. 24 धावात 4 बळी घेणाऱया अनुभवी स्टार खेळाडू एहसान खानला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खानने आशिया चषक स्पर्धेत पात्रता संपादन करता आले, त्याबद्दल आनंद व्यक्त केला. शिवाय, सर्व सहकार्याबद्दल क्रिकेट मंडळाचे आभारही मानले. ‘आशिया चषक स्पर्धेत पात्रता मिळवण्यासाठी तिन्ही सामने जिंकावे लागतील, याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. वास्तविक, स्पर्धेत एकापेक्षा एक दिग्गज संघ असल्याने आव्हान कडवे असेल. पण, आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूसाठी हा अनुभव सर्वोत्तम असेल’, याचा त्याने येथे उल्लेख केला.
संयुक्त अरब अमिरातचा कर्णधार चुंदंगपोयिल पुथियापुरयिल रिझवानने गोलंदाजीत फटका बसला असल्याचे खुल्या दिलाने कबूल केले. तो म्हणाला, ‘आमच्या गोलंदाजांनी बऱयाच अतिरिक्त धावा दिल्या आणि याचा आम्हाला फटका बसला. डय़ू फॅक्टरमुळे चेंडू सहजपणे बॅटवर येत होता. त्याचा प्रतिस्पर्धी संघाला लाभ झाला’.
आता प्रत्यक्ष स्पर्धेत हाँगकाँगची पहिली लढत दि. 31 ऑगस्ट रोजी भारताविरुद्ध आणि त्यानंतर दि. 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल. भारत-पाकिस्तान हे कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी दि. 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने भिडणार आहेत. उभय संघात 9 महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच एखादी आंतरराष्ट्रीय लढत होत आहे.
विराट कोहली, बाबर आझमच्या भेटीचा व्हीडिओ ट्रेंड
आधुनिक क्रिकेटमधील दोघे दिग्गज फलंदाज भारताचा विराट कोहली व पाकिस्तानचा बाबर आझम बुधवारी सराव सत्रादरम्यान आमनेसामने आले, त्यावेळी त्यांनी एकमेकांशी काही काळ संवाद साधला. या छोटेखानी भेटीचा बीसीसीआयने शेअर केलेला व्हीडिओ ट्रेंड होत राहिला.
भारतीय क्रिकेट संघाने दुबईत दि. 24 पासून सराव सत्राला सुरुवात केली असून बीसीसीआयने आपल्या ट्वीटर पेजवर त्याचा व्हीडिओ शेअर केला. भारतीय संघातील खेळाडूंनी आशिया चषक स्पर्धेतील प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तान व अफगाणच्या काही खेळाडूंसह यावेळी संवाद साधला होता.
केरळचा इलेक्ट्रिकल इंजिनियर बनला युएईचा टी-20 कर्णधार!
पात्रता फेरीत शेवटच्या दिवसापर्यंत लढत आलेल्या संयुक्त अरब अमिरातचा कर्णधार रिझवान हा मूळचा केरळचा असून त्याने इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पूर्ण केले आहे. भारतात रिझवानला रणजी चषक खेळण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली नाही. पण, 19 वर्षाखालील कूचबिहार चषक व 23 वर्षाखालील गटात तो खेळला. केरळ संघाकडून त्याने दक्षिण आफ्रिका दौराही केला. त्यावेळी काही काळ संजू सॅमसन देखील त्याच्या समवेत होता. मात्र, नंतर रिझवानने इंजिनियरिंग पूर्ण करण्यासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि यामुळे त्याला क्रिकेटमध्ये वरिष्ठ स्तरावर पोहोचता आले नव्हते. पुढे त्याचा रणजी संघात समावेश झाला. मात्र, अंतिम एकादशमध्ये स्थान मिळाले नव्हते.
इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर रिझवानने युएईला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आणि तेथे त्याची क्रिकेटची आवड खऱया अर्थाने बहरु शकली. आशिया चषक पात्रता स्पर्धेत नेतृत्वाची धुरा त्याच्याकडेच होती. गतवर्षी आयर्लंडविरुद्ध वनडे लढतीत संघ 3 बाद 51 असा अडचणीत असताना रिझवानने 109 धावांची खेळी साकारत आपली उपयुक्तता अधोरेखित केली होती.
रिझवानने कोचिन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पदवी पूर्ण केली असून पोस्ट खात्यात नोकरीची संधी मिळाल्याने त्याला मायदेशी परतण्याचा पर्याय उपलब्ध होता. पण, त्याने युएईला जाण्याचा निर्णय घेतला. युएईमधील काही स्थानिक संघांकडून उत्तम प्रदर्शन साकारल्यानंतर त्याच्यासाठी राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडले गेले. युएईने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व विभागणी केली असून रिझवानकडे टी-20 तर अहमद रझाकडे वनडे क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपवले गेले आहे.