अध्याय विसावा
वेदवचनाबद्दल त्यांचे मत मांडताना भगवंत म्हणाले, उद्धवा आपला दोष असेल तो टाकून, गुण असेल तोच घ्यावा, हाच वेदाचा हेतू आहे. दुसऱयाच्या दोषांकडे दुर्लक्ष करून, आपण स्वतः त्याचा गुण घ्यावा पण माझ्या कृपेशिवाय हे होत नाही. दुसऱयाचे गुणदोष न पाहता आपण स्वतःच ब्रह्मसंपन्न होण्याइतकी परिपूर्ण कृपा संपादन कशी करावी? असे म्हणशील तर ऐक. माझ्या कृपेचे आश्रयस्थान माझी भक्ति होय.
माझ्या कथांमध्ये ज्याला श्रद्धा आहे आणि ज्याला सर्व कर्मांविषयी वैराग्य उत्पन्न झाले आहे, तसेच ज्याला सर्व विषय दुःखरूप आहेत, हेही माहीत आहे, पण तो ते सोडू शकत नसला, तरी त्याने दृढनिश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने माझे भजन करावेच. मात्र विषयसेवन करताना परिणामी ते दुःख देणारे आहेत, असे मानून त्यांच्यात दोषच पाहावेत. माझी कथा श्रवण केल्याने संसाराचे धरणे उठते, असा जीवाभावापासून ज्याचा विश्वास असतो, पाण्यात बुडून प्राण जात असतानाही जर मनाला हरिकथेची आठवण झाली, तर जन्ममरणाचा फेरा चुकेल इतका ज्याचा भाव दृढ असतो, त्याच्या ठिकाणी अनिवार विरक्ति उत्पन्न होते. त्याला प्रपंचांतील भाकडकथा आवडत नाहीत.
लौकिकावरही त्याचे प्रेम बसत नाही पण निखालस सर्व सोडून देण्याइतकेही धैर्य त्याच्या अंगात नसते. गंमत म्हणजे सर्वसामान्य लोकांची हीच अडचण असते. असे असले तरी त्याने एकनि÷sने व आवडीने माझे भजनच करीत जावे. संसार विषयोपभोग सोडून देण्याइतके ज्याच्या अंगी सामर्थ्य नसते, त्याला विषयोपभोग घेण्याचा जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा तो त्यांचा असा उपभोग घेतो की, जणूं काय सुळी देण्याकरिताच त्याला शृंगारले आहे. सुळी देण्यात येणाऱया मनुष्याला उत्तमोत्तम केळी किंवा साखर आणून दिली, किंवा दूधतूप नेऊन ओठाला लावले, तरी त्या खाण्याच्या पाठीमागून शूळ येण्याचा धाक असल्यामुळे त्याच्या पोटात धस्स होत असते त्याप्रमाणे विषयाचा उपभोग घेत असता पुढे अत्यंत भयंकर नरक त्याला दिसतो व तो म्हणतो नारायण, मधुसूदन, माधव मला का बरे विसरला असेल? हे कृपाळु बा श्रीकृष्णा! मी विषयरूप बंदिखान्यांत पडलो आहे, आपण गरुडावर बसून लौकर या आणि मला सोडवा. मी विषयरूप विशाल नक्राच्या जबडय़ात सापडलो आहे, याकरिता गजेंद्रासाठी जशी उडी घालून धावून आलात, त्याप्रमाणे माझ्यासाठीही उडी घाला. हे गोविंदा! धाव धाव आणि मला पाव. माझी विषयबाधा दूर कर. हे मुकंदा! गदा घेऊन लौकर धाव. माझी उपेक्षा करू नको. तू अडलेल्याचा साहाय्यकर्ता असून भक्तांचा कैवारी आहेस. मी विषयसागरात बुडतो आहे ह्याकरिता लौकर माझा उद्धार कर.
मी विषयसागरात बुडालो आहे, कामलोभाच्या लहरीत गटांगळय़ा खातो आहे क्रोधाने तर माझी पुरी दुर्दशा उडविली आहे आणि अभिमानरूप सुसरीने मला गिळले आहे. हे श्रीहरी! तू दीनदयाळ आहेस. ते तुझे ब्रीद तू खरे कर, निजबोधाच्या हाताने मला धरून मज दीनाचा उद्धार कर. ही विषयाची बाधा फार कठीण आहे. मला श्रीहरि का बरे पावत नाही? असा आक्रोश करून तो श्रीहरीचे स्मरण करतो. विषयाची ही मगरमिठी सुटत नाही. कामाच्या दाढेत अडकलो आहे. कांही केले तरी ही मिठी सुटत नाही. ह्याकरिता आता श्रीकृष्णा! लवकर धाव.
उद्धवा! असा स्वाभाविक पूर्णपणे अनुताप व्हावा, तेव्हाच माझी कृपा होते. ज्या ठिकाणी खराखुरा अनुताप नाही, तेथे माझी कृपाही कधी होत नाही. देहात अनिवार अनुताप होणे, हेच माझ्या कृपेचे वर्म म्हणजे लक्षण आहे, असे तू समज. माझ्या कृपेशिवाय माझी भक्तीही उत्पन्न होत नाही. माझ्या कृपेची ज्याला प्राप्ती होते, तोच माझी अनन्य भक्ति करतो. माझ्या कृपेचे लक्षण हेच की, प्राप्त झालेले विषय भोगत असताना माझ्या अनन्य भजनांत तूट म्हणून पडत नाही. ह्याचच नाव माझी ‘पूर्ण कृपा’.
क्रमशः