ऑनलाईन टीम / तरुण भारत :
तब्बल 70 वर्षांनंतर चित्ता भारतात परतला आहे. आठ आफ्रिकी चित्त्यांचं 8 हजार किलोमीटरचा प्रवास करुन आज सकाळी विशेष विमानानं भारतात आगमन झालं. मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्क येथे या चित्त्यांना ठेवलं जाणार आहे.
या चित्त्यांसाठी नामिबियातील चित्ता कंझर्वेशन फाउंडेशनसोबत भारताने 12 वर्षांचा करार केला आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात हे चित्ते काही दिवस खास बंदोबस्तात राहणार आहेत. साधारण एक महिना त्यांच्यावर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून असेल.
1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर 1970 साली देशात आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर यंदा 2022 मध्ये हा प्रोजेक्ट पूर्णत्वास आला.