शनिवारी उघडीप, माळरानावर मका, ज्वारीची पेरणी जोमात
@ प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठ दिवसांपासून सुरू असलेला पाऊस शनिवारी काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे बळीराजा पुन्हा शेतीकामाकडे वळला आहे. परतीच्या पावसामुळे बटाटा, रताळी, भुईमूग आणि सोयाबीन काढणी खोळंबली होती. मात्र शनिवारी पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱयांनी बटाटा, रताळी आणि भुईमूग काढणीला पुन्हा प्रारंभ केला आहे.
मागील पंधरा दिवसांत अधून-मधून परतीचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती कामे ठप्प झाली होती. दरम्यान बटाटा, रताळी काढणी झालेल्या शिवारात पेरणी कामेही थांबली होती. मात्र आता पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने माळरानावर पेरणी कामांना जोर आला आहे. बटाटा, रताळी, भुईमूग आणि सोयाबीन काढणीनंतर मोठय़ा प्रमाणात मका, बाजरी आणि ज्वारीची पेरणी केली जाते. जनावरांना चाऱयाची सोय व्हावी, यासाठी पेरणी केली जाते. मात्र सातत्याने होत असलेल्या पावसामुळे काढणी कामाबरोबर पेरणीही थांबली होती. मात्र आता पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा काढणी आणि पेरणीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
पावसाच्या उघडिपीच्या प्रतीक्षेत शेतकरी
यंदा बटाटा लागवडीत घट झाली आहे. बटाटा कुजून उत्पादनावर परिणाम होत असल्याने लागवड कमी केली आहे. बटाटय़ाऐवजी रताळी वेल लागवडीकडे शेतकऱयांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा रताळय़ांचे विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. आतापर्यंत पावसाने उत्तम साथ दिल्याने पिके जोमाने आली आहेत. मात्र परतीचा पाऊस अधिक प्रमाणात होत असल्याने भातपिकाला धोका निर्माण झाला आहे. मध्यंतरी झालेल्या अतिपावसामुळे नदीकाठावरील भातपिकाला फटका बसला होता. तर बटाटा पीकदेखील खराब झाले होते. मात्र आता परतीचा पाऊस सातत्याने होत असल्याने पोसवणीच्या अवस्थेत असलेल्या भातपिकाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांतून उघडीपीची प्रतीक्षा केली जात आहे.