समग्र साहित्य चर्चासत्रात गौरवोद्गार : रंगभूमी क्षेत्रातही उमटविला ठसा
प्रतिनिधी / बेळगाव
साहित्य क्षेत्रात प्राध्यापक बी. एस. गवीमठ यांचे योगदान मोठे आहे. खासकरून शतकाचा इतिहास असलेल्या केएलई संस्थेचा इतिहास मांडण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे. शिक्षण, साहित्य, रंगभूमी आदी क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे, असे गौरवोद्गार निवृत्त प्राचार्य डॉ. व्ही. एस. माळी यांनी प्रा. गवीमठ यांच्या समग्र साहित्यावरील चर्चासत्रात बोलताना काढले.
रविवारी कन्नड साहित्य भवन येथे हे चर्चासत्र झाले. केंद्रीय साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. सर्जू काटकर यांनी यावेळी उद्घाटन केले. डॉ. एच. बी. राजशेखर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बेळगावचे यापूर्वीचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, डॉ. बसवराज जगजंपी उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर डॉ. व्ही. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली पहिले सत्र झाले.
प्राचार्या डॉ. प्रज्ञा मत्तीहळ्ळी, जिल्हा प्रौढ शिक्षणाधिकारी जयश्री ए. एम., जिल्हा लेखिका संघटनेच्या सचिव डॉ. भारती मठद, य. रु. पाटील आदींनी प्रा. बी. एस. गवीमठ यांच्या विविध साहित्यकृतींवर प्रकाश टाकला. त्यानंतर शिरीश जोशी, डॉ. पी. जी. केंपण्णावर, डॉ. ए. बी. घाटगे, महेश गुरनगौडर आदींच्या उपस्थितीत डॉ. रामकृष्ण मराठे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे सत्र झाले. चर्चासत्रानंतर अनेक मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.