काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांची मागणी
प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा नगरपालिकेने घरपट्टी व व्यवसायिक घरपट्टीमध्ये जी दरवाढ केली आहे, त्याचा फेरविचार करावा व नागरिकांना विश्वासात घेऊनच योग्य दर निश्चित करावेत. घरपट्टी हा पालिकेचा महसूल उत्पादनातील मुख्य स्त्रोत असला तरी जनतेवरही त्याचा बोजा होऊ नये अशी मागणी फोंडा गट काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
फोंडय़ातील काँग्रेस नेते राजेश वेरेकर व नगरसेवक विलीयम आगियार यांनी घरपट्टीबाबत फेरविचार करण्याची मागणी केली आहे. फोंडा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी जॉन पेरेरा व सर्फराज हे उपस्थित होते. घरपट्टी वाढविताना नागरिकांवर त्याचा बोजा होणार नाही हा विचार करुन टप्प्याटप्पयाने त्यात वाढ करायला हवी होती. नागरिक व व्यवसायिक जेव्हा कर भरतात तेव्हा त्याच्या बदल्यात तेवढय़ा चांगल्या सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. फोंडा शहरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मार्केट प्रकल्पाच्या सुधारणेसाठी गेल्या काही वर्षांपासून पालिकेकडे ठोस योजना नाही. गोल्डन प्रकल्प बरीच वर्षे रखडून पडलेला आहे. नागरिकांना आधी चांगल्या सुविधा द्या व त्यानंतरच योग्य प्रमाणात करवाढ करा असे राजेश वेरेकर म्हणाले. सध्या काही राजकीय लोक या मुद्यावरुन राजकीय भांडवल करीत आहेत. विरोध करणारे हे लोक दुटप्पी असून एका बाजून विरोध करतात तर दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांची साथही देतात. जनतेची दिशाभूल करणाऱया या लोकांपासून सावध राहण्याचा इशाराही त्यांनी दिला.
करवाढ करताना विश्वासात घेतले नाही ः विलियम आगियार
घरपट्टीमध्ये वाढ करताना आपल्याला नगरसेवक म्हणून विश्वासात घेतले गेले नाही. मुळात बैठकीच्या कामकाजात हा करवाढीचा विषय नव्हता. त्यामुळे पालिकेने पुन्हा नव्याने बैठक घेऊन करवाढीवर फेरविचार करावा असे विलियम आगियार म्हणाले. महसूल वाढीसाठी पालिकेने नागरिकांवर कराचा बोजा न लादता महसूल वाढीचे इतर मार्गही अवलंबवावेत असे त्यांनी सांगितले.