ऊसवाहू ट्रक्टर दोन बोटींवर लादून नदीपात्रातून केली वाहतूक
प्रतिनिधी /बेळगाव
शेतात पिकविलेला ऊस कारखान्याला पोहोचविण्यासाठी शेतकऱयांना अनेक दिव्यातून जावे लागते. एकतर ऊसदराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर दुसरीकडे लहरी हवामानामुळे अतोनात नुकसानाला सामोरे जावे लागते आहे. कृष्णा नदीकाठावरील शेतकऱयांचीही कहाणी काही वेगळी नाही. येथील शेतकऱयांना ऊस कारखान्याला पोहोचविण्यासाठी नदी पार करावी लागते. यासाठी शेतकऱयांनी लढविलेली नामी शक्कल सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय बनली आहे.
कंकणवाडी, ता. जमखंडी, जि. बागलकोट येथील ऊस उत्पादक शेतकऱयांनी ऊस भरलेला ट्रक्टर नदीपार करण्यासाठी चक्क दोन बोटींचा वापर केला आहे. यामध्ये त्यांनी दोन बोटी जोडण्यासाठी लोखंडी अँगलचा वापर केला आहे. या अँगलवरच ट्रक्टरची चाकेही उभी करण्यात येतात. किनाऱयावर पोहोचताच हे अँगल जमिनीवर टेकतात आणि ऊस भरलेला ट्रक्टर त्यावरून आरामात जमिनीवर उतरतो. शेतकऱयांनी केलेल्या या धाडसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कृष्णा नदीच्या पाण्याने चहूबाजूंनी घेरल्याने सुमारे 700 एकर जमिनीतील ऊस किंवा इतर शेतीमाल इतरत्र पोहोचविण्यासाठी बोटींचाच वापर करावा लागतो. वर्षातून किमान सहा महिने तरी बेटसदृश जमिनीवर राहणाऱया 300 कुटुंबीयांना कसरत करावी लागते. यापूर्वी ऊस बोटीतून आणून नदीपार केला जायचा. त्यानंतर तो ट्रक्टरमध्ये भरण्यात येत होता. यासाठी वेळ खूप लागत होता. खर्चही अधिक येत होता.
खर्च कमी करण्यासाठी शेतकऱयांनी दोन बोटींवर ट्रक्टर चढवून नदीपात्र ओलांडण्याची शक्कल लढविली आहे. दोन बोटींवर ट्रक्टर उभा करण्यासाठी या शेतकऱयांनी एक लोखंडी अँगल तयार करून घेतला आहे. यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च आला आहे. दोन बोटींवर अँगल ठेऊन त्या अँगलवर ऊसवाहू ट्रक्टर चढविला जातो. बोटीतून ट्रक्टर नदीच्या पलीकडे पोहोचविण्यात येत आहे. प्रत्यक्षात यामध्ये शेतकऱयांच्या जीवाला धोका असून इतर नुकसानीचीही शक्मयता आहे. तरीही शेतकऱयांनी केलेल्या या ‘जुगाडा’चे आणि दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.