केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा दावा
प्रतिनिधी / पणजी
पर्यटनाच्या दृष्टीने गोव्याची प्रतिमा देशविदेशात मलीन होणे हा प्रकार भविष्यात या व्यवसायासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे पर्यटकांना सतावण्याचे प्रकार बंद झाले पाहिजेत. ड्रग्ज व्यवसायही नष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने पर्यटन कायद्याची अंमलबजावणी सुरू केली ही चांगली गोष्ट आहे, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
गुरुवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी डॉ. गोविंद काळे आणि सुरज नाईक यांची उपस्थिती होती.
बेकायदा कृत्त्ये रोखण्यासाठी केंद्राचे सहकार्य
गोव्यात पर्यटन क्षेत्रातील अवैध व बेकायदा कृत्ये रोखण्यासाठी पर्यटनमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करताना नाईक यांनी गोव्यात गुन्हेगारी वाढण्यामागे ड्रग्ज हेच प्रमुख कारण असल्याचे सांगितले. हा व्यवसाय थोपविण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.
ठरविक बेकायदा व्यवसायिकांमुळे गोव्याची बदनामी
पर्यटन व्यवसायातील ठराविक लोकांमुळे गोव्याची बदनामी होत आहे. त्यात समुद्रकिनारी फेरीवाल्यांकडून पर्यटकांची सतावणूक, बेकायदा मसाज पार्लर, अधिमान्यता नसलेले गाईडस्, यांचा त्यात जास्त भरणा असतो. अशा लोकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. गोवा सरकारने आता कारवाई सुरु केली आहे हे एका अर्थी बरेच झाले असून याच धर्तीवर केंद्र सरकार देखील देशभरात अशा कारवाईसाठी तरतुदी करण्याच्या प्रयत्नात आहे, असे नाईक यांनी सांगितले.
दरम्यान, मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ आयुर्वेद, आदी प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. त्यासंबंधी तारीख लवकरच निश्चित होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.