पुणे / प्रतिनिधी :
वेगवेगळय़ा वैद्यकीय शाखांनी अनेक आजारांवर यशस्वीपणे मात केल्यामुळे आज आयुष मंत्रालयाची लोकप्रियता, विश्वासार्हता आणि स्वीकार्यता जागतिक पातळीवर वाढली आहे, असे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल (Sarbanand Sonowal) यांनी सांगितले.
सोनोवाल यांनी पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. सोनोवाल म्हणाले, परंपरागत चिकित्सा पद्धतीला लोकांनी जोडलेले राहणे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहणे हा ‘हर दिन हर घर आयुर्वेद’ या उपक्रमाचा मूळ हेतू आहे. निसर्गात जी संपदा आणि शक्ती आहे त्याची माहिती लोकांना व्हावी, हेही त्याचे उद्दिष्ट आहे.
अधिक वाचा : शिंदे गट पुन्हा गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत
2014 पर्यंत आयुष क्षेत्राची बाजारपेठ फक्त 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या मर्यादित आकाराची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने आणि निष्ठापूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे आणि त्यांनी त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यामुळे आज हा उद्योग जगभरात 18 अब्ज 2 कोटी अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. आजारांवर मात करणे आणि आरोग्याला चालना देणे, हे आयुष मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे समान लक्ष्य असल्यामुळे ही दोन मंत्रालये सध्या एकत्र काम करत आहेत. आयुष मंत्रालयाची अन्य उत्पादने असतील किंवा औषधे असतील लोकांना त्यामार्फत दिलासा मिळाला आहे आणि त्यांचा विश्वास वाढला आहे, असे त्यांनी नमूद केले.