पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील उद्योग बाहेरील राज्यात जात असल्याची विरोधकांची टीका राजकीय स्वरुपाची आहे. आता आम्ही महाराष्ट्रात नवे उद्योग आणून दाखवून, असे प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिले.
एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राणे म्हणाले, विरोधक सातत्याने राज्यात उद्योगासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक उद्योग बाहेर जात आहेत, अशी टीका करत आहेत. राजकीय दृष्टीकोनातून ही टीका केली जात आहे. कालपर्यंत हे सत्तेवर असताना राज्यात उद्योग आणू शकले नाहीत आणि ते आता आमच्यावर टीका करीत आहे. त्यांच्या हातून काही झाले नाही. आता आम्ही राज्यात नवीन उद्योग आणू आणि बेरोजगारी कमी करू. तसेच जयंत पाटील यांचा अभ्यास कमी असून नारायण राणेंवर बोलताना अभ्यास करून बोलावे. राज्यातील कोणतेही उद्योग हे बाहेर गेले नसून नोटबंदीमुळे उद्योग येण्यास कोणतीही बंधने निर्माण झालेली नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार
ओल्या दुष्काळासाठी काही नियम असतात
शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि मदत करावी अशी मागणी विरोधक करीत आहेत. ओला दुष्काळ जाहीर न करतादेखील आज आम्ही मदत करीत आहोत. ओला दुष्काळ जाहीर करण्यास केंद्र आणि राज्य सरकारचे काही नियम असतात. हेच उद्धव ठाकरे निवडणुकीपूर्वी 50 हजार रुपये इतकी मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, अशी मागणी करीत होते. ते अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना एकदा तरी मदत केली का? ते एकदा तरी शेतकऱ्याच्या बांधावर गेले का? अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणे बंद करावे, असेही राणे म्हणाले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जिथे जिथे जात आहे. त्या ठिकाणी काँग्रेस तोडो सुरू असून, तेथील नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.