झी टीव्हीवरील मालिकेत श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अक्षय मुदवाडकर यांचे प्रतिपादन : शिवोली स्वामी समर्थ मठ प्रकटदिनी भक्तांची अलोट गर्दी
गिरीश मांद्रेकर / म्हापसा
श्री स्वामी समर्थाची भूमिका आपण साकारत आहे तो एक नशिबाचाही भाग आहे. आपल्या आजीने दिलेला ‘देव करो आणि तुला स्वामीची भूमिका करण्याचा योग मिळो’ या आशीर्वादाने आपले जीवनच बदलून टाकले, असे प्रतिपादन अभिनेते अक्षय मुदवाडकर यांनी शिवोली येथे केले.
झी मराठी चॅनलवर प्रसारित होणाऱया श्री स्वामी समर्थ या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अक्षय मुदवाडकर सत्कार सोहळय़ात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या दरम्यान ते आपल्या स्वामी समर्थांच्या भूमिकेबद्दल बोलत होते. त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गांनी एकच गर्दी केलेली पहायला मिळाली. यावेळी शिवोली मठाचे अध्यक्ष निलेश वेर्णेकर यांच्याहस्ते अक्षय मुदवाडकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपअधीक्षक सुदेश नाईक, निरीक्षक प्रशल देसाई, पत्रकार संतोष गोवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मालिकेने 600 प्रयोगाचा टप्पा गाठला हीच मोठी स्वामीची अनुभूती
आज सर्व प्रेक्षक वर्गाच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे श्री स्वामी समर्थ मालिकेने 600 प्रयोगाचा टप्पा गाठला आहे. आम्ही शुटींग करतो व तुम्ही आम्हाला टिव्हीवर पाहतात. पाठीवर शाबासकीची दाद मिळते. तेच आमच्यासाठी अनमोल असते. या सगळय़ा आठवणी आम्ही साठवून ठेवतो. ध्यानी मनीही नसताना श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेसाठी विचारणा होते? ती स्वीकारुन त्याचे प्रयोग करतो आणि आपला अभिनय प्रेक्षकांना पसंत पडतो. सर्वांचे प्रेम मिळते. करत करत मालिका 600 प्रयोगाचा टप्पा गाठते. यापेक्षा अजून स्वामीची अनुभूती आपल्यासाठी काय असेल, असे ते म्हणाले.
देव करो आणि तुला स्वामीची भूमिका मिळो
एक दिवस आजीला सांगितले व बाहेर निघालो. केसांची टक्कल करुन घरी आलो. आमच्या घरात स्वामींचा फोटो आहे त्या फोटोखाली उभा राहिलो. समोर आजी होती. तोपर्यंत तिला काहीच माहीत नव्हते. मी आजीला म्हटले, काय गं आजी फोटो व आपल्यामध्ये साम्य वाटते काय? त्या म्हणाल्या तसाच दिसतो आणि देव करो आणि तुला तिच भूमिका साकारण्याचा योग मिळो. स्वामी म्हणतात ना वास्तू आणि ततास्तू. या छोटय़ा गोष्टी असतात त्या ओळखता आल्या पाहिजे.
स्वामीची माहिती मुलांनाही होणे गरजेचे
स्वामी नामातच सर्व काही असते त्या उत्साहातच सर्व काही असते. जी भूमिका आपण करतो त्यात माझे काहीच नाही तर सर्व काही स्वामीचे आहे. लोकांना भेटतो खूप आनंद होतो. आपण रुग्णांना भेटतो आणि त्यांच्या चेहऱयावर एक वेगळा आनंद होतो. त्यांच्या इतका आनंद आपल्यास होतो. त्यापलिकडे आपल्यास काय हवे आहे. आपण जी भूमिका साकारतो त्याची ही पावती आहे. स्वामी काय आहेत, कोण आहेत, त्यांची लिला काय आहे हे आम्हाला माहीत आहे पण ती लहान मुलांना माहीत नाही. त्याची माहिती त्यांना होणे काळाची गरज आहे. तुम्ही सुद्धा ही मालिका पाहतात व ती तुम्हाला आवडते. ती खरी संस्काराची पोचपावती आहे असे अक्षय मुदवाडकर म्हणाले.
स्वामीच्या स्वभावातच तीन गुण आहेत
एका मुलाला पालकाने फोन दिला त्याच्याजवळ बोलणे झाले. सर्व माहिती जाणून घेतल्यावर त्या मुलाने प्रश्न केला आपण आपल्याबरोबर गोटय़ा खेळायला कधी येताय? घरी गोटय़ा आणून ठेवल्या आहेत. तुम्ही मालिकेत टिव्हीवर खेळतात मग माझ्याबरोबर खेळायला कधी येणार? असे त्याने विचारले. किती घ्यावे, किती साठवावे आणि किती सांगावे अशाही काही गोष्टी आहेत. लहान मुले कनेक्ट होतात ते खूप बरे. स्वामी म्हणायला तितके सोपे नाही. आज 600 मालिका झाल्या असल्या तरी रोज स्वामी आपल्याला वेगळ्य़ाने कळतात. त्यांच्या स्वभावातच तिन्ही गुण आहे. ते रागावतात पण मिश्किल पण आहे आणि चिढतात पण. स्वामी रागावतात ते तुमच्या भल्यासाठीच असते. त्यातील काय घ्यायचे, काय सोडायचे हे तुमच्या हातात आहे.
माणसात देवाचा शोध घ्या
संसार एकटय़ाचा नसतो तो दोघांनी मिळून चालविला पाहिजे. दगडात देव शोधू नका तर माणसात देव शोधा. दोन शब्दाचा अर्थ इतका आहे की, त्यात तुमचे आयुष्य तुम्ही बदलून टाकू शकता. तुम्ही स्वामींबद्दल वाचा आणि जाणून घ्या. आज वाचले आणि उद्या स्वामी समजले असे नाही. ही आयुष्यभराची दोरी आहे. नवीन अभ्यास करीत राहा त्यातून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आम्हीही प्रामाणिकपणे काम करून तुम्हाला पुढे नेऊ. सर्वांनी आम्हाला असेच भरभरून प्रेम देत राहा.
तो क्षण आजही विस्मरणीय
ज्या क्षणी स्वामींनी चोळपांच घर सोडले आणि मठाकडे गेले तो दिवस आपल्या आयुष्यातील अस्विस्मरणीय आहे. कारण त्यावेळी यसो खरोखरच रडल्या. ते शुटिंग होते पण त्यात आम्ही सर्वजण एकरुप झालो होतो. शुटींग सुरू असताना अश्रू आवरता येत नसल्यास त्यावेळची परिस्थिती त्या काळी काय असेल हे सांगता येत नाही. हे प्रसंग खूप जवळचे आहे. आम्ही ते विसरू शकत नाही. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन खरोखरच बदलतो आणि तो आपल्या बाबतीत झाल्याचे ते म्हणाले. सर्व गोष्टी घडणारच पण त्या गोष्टीची योग्य वेळ यायला पाहिजे. असे म्हणत ते म्हणाले, ‘शिव हरी शंकर, नमामी शंकर, शिव शंकर शंभो’ हे गिरीजापती नमामी शंकर, शिव शंकर शंभो! श्री स्वामी समर्थ महाराज की जय.