पुणे / प्रतिनिधी :
शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजप आतापर्यंत कधीही लोकसभा निवडणूक लढलेला नाही. मात्र, आता याठिकाणी कुणाला उमेदवारी द्यायची, हे पक्ष ठरवेल. या मतदारसंघात पक्षात येण्यासाठी जे इच्छुक आहे, त्यांचे स्वागत आहे, असे केंद्रीय जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल
(Prahlad Singh Patel) यांनी सांगितले. दरम्यान, शिरूरमधून लढण्याची तयारी भाजपाने सुरू केल्याने शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Sivajirao Adhalrao patil) यांचे काय होणार, हा प्रश्न अधिक बिकट झाला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार योगेश टिळेकर, धर्मेंद्र खांडरे उपस्थित होते.
पटेल म्हणाले. शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपला कधीच लढायची संधी मिळाली नाही. या मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित आहे आणि स्थानिक नागरिकांचीदेखील तयारी आहे. त्याकरिता संघटनात्मक पातळीवर जी कामे करायची आहेत, ती आम्ही करत आहोत. या ठिकाणी उमेदवार कोण, हे पक्षाच्या केंद्रीय पातळीवरून ठरेल. शिरूर जिंकण्यासाठी 2024 ची निवडणूक आम्ही लढवू. खासदार कोल्हे काम करत नाहीत, कामाची जबाबदारी घेत नाहीत आणि संबंधित काम झाल्यानंतर केवळ श्रेय घेतात, अशी भाजपची कोल्हे यांच्याबाबत धारणा आहे. त्याउपर जर कोणी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील, तर त्यांचे स्वागतच करू. शिरूरमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद चांगली आहे. मात्र, येथील आदिवासी भागात केंद्राच्या योजना पोहोचवण्यासह संघटनात्मक काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : सीमाप्रश्नी केंद्राची दुटप्पी नीती; डॉ. नीलम गोऱ्हे यांची टीका
बैलगाडा शर्यतीबाबत पाठपुरावा
बैलगाडा शर्यतीबाबत आमदार महेश लांडगे पाठपुरावा करत आहेत. याबाबत दिल्ली न्यायालयात केस सुरू असून शर्यंत सुरू करण्याच्या मागणीस यश येईल, असेही पटेल यांनी यावेळी नमूद केले.
राज्यपालांविषयी भाष्य करणे टाळले
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू आहे. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी नेमके काय वक्तव्य केले, हे मी ऐकलेले नाही. हे पद संवैधानिक असल्याने याबाबत काहीही भाष्य करता येणार नाही, असे सांगून पटेल यांनी या वादावर भाष्य करणे टाळले.