शिलाँग / वृत्तसंस्था
मेघालयची राजधानी शिलाँग येथे सरकारविरोधी आंदोलन गेले सहा दिवस सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी आसाम पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मेघालयचे पाच नागरीक ठार झाले होते. दोन्ही राज्याच्या सीमाभागात असणाऱया मुक्रोह या खेडय़ात ही घटना घडली होती. तेव्हापासून मेघालयच्या काही भागांमध्ये आंदोलन होत आहे. त्यामुळे शिलाँगमध्ये इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे.
काही बिगर सरकारी संस्थांनी हे आंदोलन सुरु केले असून त्याला काही प्रमाणात लोकांना प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रशासनाने आंदोलनात हिंसाचार होऊ नये म्हणून उपाय योजना केलेली आहे. महत्वाच्या प्रशासकीय कार्यालयांना पोलीस संरक्षण देण्यात आले असून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मेघालयाच्या सरकारने आसाम सरकारविरोधात कारवाई करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा आणि राज्याचे गृहमंत्री लहमेन रिंबुल यांच्या प्रतिमांचे रविवारी दहन केले. पोलिसांनी लाठीमार करुन आंदोलकांना पांगविले. मात्र, अन्य काही स्थानी लोक रस्त्यावर येऊन निषेध करीत आहेत.
सीमावाद सोडवा आसाम आणि मेघालय यांच्यात काही स्थानी सीमावाद आहे. काही खेडी आसामला देण्यात आल्याची मेघालयची तक्रार आहे. सर्व सीमावाद सोडविला जाईल असे आश्वासन 2021 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. मात्र, अद्याप सीमावाद सुरुच असल्याने त्यांच्या विरोधात आंदोलन होत असल्याची माहिती काही संघटनांनी दिली. तथापि, केंद्र सरकारचे परिस्थितीकडे लक्ष असून येत्या काही दिवसांमध्ये सर्वांचे समाधान केले जाईल. दोन्ही राज्यांना विश्वासात घेऊन सीमावाद सोडविण्यात येईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.