पेशावर / वृत्तसंस्था
भारतात उत्पात माजविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आणि पाकिस्तानकडून साहाय्य घेत असलेल्या लष्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मद या इस्लामी दहशतवादी संघटनांना आता अफगाणिस्तान आश्रय देत आहे, असा गौप्यस्फोट अफगाणिस्तानचे माजी अधिकारी रहमतुल्ला नाबिल यांनी केला आहे. तसेच त्यांनी भारतालाही सावधानतेचा इशारा दिला आहे. भारताने अफगाणिस्तानशी मधुर संबंध ठेवताना बेसावध राहू नये. कारण लष्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटना अफगाणिस्तानही कार्यरत आहेत. याच संघटना भारतात हिंसाचार आणि अस्थिरता माजविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना अफगाणिस्तानच्या प्रशासनाने आपल्या देशात आमंत्रित केले आहे, अशी माहिती नाबिल यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
तालिबानच्या सध्याच्या राजवटीशी संबंध भारताने ठेवावेत. तथापि, आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करु नये. तालिबानची सध्याची राजवट कितपत विश्वासार्ह आहे, आहे, हे अद्याप सिद्ध व्हायचे आहे. सध्याच्या नेत्यांशी संबंध राखताना अफगाणिस्तानच्या माजी नेत्यांच्या संपर्कातही भारताने राहणे आवश्यक आहे. कारण या नेत्यांना अफगाणिस्तानच्या अंतर्गत कारवायांची चांगली माहिती आहे. ती माहिती भारताला उपयुक्त ठरु शकते, असेही नाबिल यांचे म्हणणे आहे.
राजवटीवर आरोप
अफगाणिस्तानची सध्याची राजवट माजी नेत्यांवर अन्याय करीत आहे. त्यांचे पासपोर्ट रद्द पेले जात आहेत. त्यांना देशात प्रवेश नाकारण्यात येत आहे. भारतासारख्या मित्रदेशांशी संबंध असणाऱया माजी नेत्यांचाही अशा प्रकारे अवमान केला जात आहे. याचसाठी भारताने सावध राहण्याची आवश्यकता आहे. अफगाणिस्तानचा खरा हेतू ओळखून मगच त्याच्याशी कसे संबंध ठेवायचे, हे ठरविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन नाबिल यांनी केले.