विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले मंदिरांचे महत्त्व ः इतिहासाच
वृत्तसंस्था / वाराणसी
भारतीय समाजात मंदिरांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगत विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी इतिहासाचे चाक आता फिरू लागल्याचे उद्गार काढले आहेत. उदयोन्मुख शक्ती असलेल्या भारतात आता देशाचा समृद्ध वारसा अन् संस्कृतीची उपेक्षा केली जाणार नसल्याचे विदेशमंत्र्यांनी वाराणसी येथील दौऱयादरम्यान म्हटले आहे.
इतिहासाचे चाक आता फिरू लागले आहे याची जाणीव आम्हाला व्हायला हवी. आमच्या देशाची संस्कृती आणि समृद्ध वारसा पुन्हा परतत आहे. भारताचा पुन्हा उदय होतोय. मंदिरांची उपेक्षा केला जाणारा काळ आता संपला आहे. त्या काळात आमच्या संस्कृतीच्या विरोधात गोष्टी व्हायच्या. परंतु आता आम्ही पुन्हा आमच्या संस्कृतीच्या दिशेने परतत आहोत असे जयशंकर म्हणाले.
मंदिर केवळ श्रद्धा आणि पूजास्थळ नव्हे तर ही सर्व सामाजिक-सामुदायिक केंद्रे आहेत. लोकांना एकत्र आणण्याचे स्थळ आणि ज्ञानाचे केंद्र आहे. तसेच कलेचे प्रवर्तक आहे, बहुतांश मंदिरे ही भारतीय वारसा जपणारी आहेत, ही मंदिरे आमच्या जीवनपद्धतीबद्दल सांगतात. आम्हाला आता जागतिकीकरणाविषयी चिंता करावी लागेल. आम्ही वेगवेगळय़ा समाजाचे आहोत असे जगातील लोक समजत आहेत, आम्ही वेगवेगळे लोक असलो आणि आमच्या वेगवेगळय़ा श्रद्धा असल्या तरीही आम्ही एक आहोत असे उद्गार विदेशमंत्र्यांनी काढले आहेत.
भारतीय संस्कृतीचा प्रसार
अन्य मान्यतांच्या प्रतिस्पर्धात्मक प्रगतीला सामोरे जाण्यासाठी भारताला स्वतःच्या संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे लागेल. ही संस्कृती जगभरात पोहोचवावी लागणार आहे. आम्हाला आमच्या संस्कृतीला चालना द्यावी लागणार आहे. आमच्या संस्कृतीचा संदेश जगातील उर्वरित देशांमध्ये न्यावा लागेल असे म्हणत जयशंकर यांनी भारतीय संस्कृतीच्या प्रसाराची आवश्यकता व्यक्त केली आहे.
योग्य स्थान मिळायला हवे
राजनयिक आणि आर्थिक दोन्हींचे संतुलन हे केवळ सांस्कृतिक संतुलन असेल तरच शक्य आहे. आमची श्रद्धा, आमचा विश्वास आणि आमच्या संस्कृतीला जगभरात मान्यता तसेच योग्य स्थान मिळायला हवे. देशाची संस्कृती आता भारताबाहेर पोहोचली आहे. नरेंद्र मोदी सरकारने कंबोडिया आणि अन्य देशांमधील भारतीय मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या दिशेने काम केले आहे. आमचे कार्य केवळ भारतात नव्हे तर पूर्ण विश्वात होत आहे. विदेश मंत्रालयाने आता आमच्या सांस्कृतिक वारशाचा जीर्णोद्धार, नुतनीकरण आणि समर्थनाच्या देखभालीसाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला असल्याचे जयशंकर यांनी सांगितले आहे.