ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कोणाचंही घरं-दार न पाडता पंढरपूर कॉरिडॉर करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपुरातील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वारकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस यांच्या आभाराचा ठराव मंजूर करण्यात आला. जर फडणवीसांनी आश्वासन पाळलं तर आम्ही त्यांची पंढरपुरात हत्तीवरुन मिरवणूक काढू, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
पंढरपूर कॉरिडॉरमध्ये स्थानिकांच्या मालमत्तांचं नुकसान होऊ शकतं, अशी भीती गावकऱ्यांना आहे. त्यामुळे पंढरपूर कॉरिडोरला स्थानिकांचा मोठय़ा प्रमाणात विरोध आहे. मात्र, कोणत्याही नागरिकाच्या घराला धक्का न लावता, कोणाचेही विस्थापन न करता पंढरपूरचा विकास करू, असं आश्वासन फडणवीस यांनी सोलापुरात एका कार्यक्रमात दिलं आहे. पंढरपूर कॉरिडोरच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती, संतभूमी बचाव समिती तसेच सर्वपक्षीय बैठक पंढरपूरमध्ये पार पडली.
अधिक वाचा : देवेंद्रजी, हे वाचाळवीर भाजपला बुडविल्याशिवाय राहणार नाहीत
त्यामध्ये जर फडणवीसांनी आपलं आश्वासन पाळलं, कोणाच्याही घराला धक्का न लावता त्यांनी पंढरपूरचा विकास केला, तर त्यांची आम्ही पंढरपुरातून हत्तीवरून मिरवणूक काढू, अशी घोषणा या बैठकीमध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे.