वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
बेळगाव येथे सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पण महामेळाव्याला दिलेली परवानगी अचानक पोलिसांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीमुळे रद्द केली. या घटनेचा कंग्राळी खुर्द ग्रामस्थांच्यावतीने निषेध नोंदविण्यासाठी एकत्र आले असता पोलिसांनी उपस्थित ग्रामस्थांना निषेध नोंदविल्यास तुमच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. यामुळे कर्नाटक सरकारच्या या अजब कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
आम्ही सर्व भारतवासीय आहोत. आपल्या देशामध्ये प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये व्यवहार करण्यास काही अडचण नाही. असे भारत देशाचे घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेत लिहिले आहे. परंतु कर्नाटक सरकार अशा महान पुरुषाने लिहिलेल्या घटनेचासुद्धा अपमान करत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.