फायर फायटर लाईनच्या गळतीवर उपाययोजना
प्रतिनिधी/ सातारा
राजधानी टॉवरसमोरील समर्थ मंदिर रोडवरील पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची सतत डोकेदुखी ठरत असलेली समस्या काढण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले. तेही महावितरण कंपनीकडून शहापूर योजनेच्या विद्युत तारेची दुरुस्तीकरता शट डाऊन घेतल्याने पाणी पुरवठा विभागाने त्याच वेळेत काम हाती घेतले आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून ही समस्या सुटत नव्हती. मंगळवारी मात्र पाणी पुरवठा विभागाने सर्जीकल स्ट्राईक करुन ही समस्या सोडविण्याचे काम दुपारपर्यंत सुरु होते.
गेली सात वर्षांपासून अधिक कालावधी राजधानी टॉवरसमोर फायर फायटर लाईनच्या गळतीचा प्रश्न आहे. फायर फायटर लाईनचे पाणी चोवीस तास सुरु असते. लागलेली गळती कधीच काढता येत नाही. गळती काढण्यासाठी पाणी पुरवठाही बंद करता येत नाही. पाणी पुरवठा बंद ठेवला की लगेच फोनाफोनी सुरु असते. त्यामुळे ही समस्या आजपर्यत तशीच राहिली गेली आहे. कित्येक वेळा माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांनी पाणी पुरवठय़ाचे अभियंता शहाजी वाठारे, द्विविजय गाढवे यांना फोन करुन व व्हाट्सअपवर फोटो पाठवून पाठपुरावा कर आंदोलनाचेही इशारे दिले. गळती लागून पडलेल्या खड्डय़ात गाडय़ा अनेकदा अडकल्या होत्या. तेवढय़ापुरते पालिकेकडून काम होत होते. पुन्हा दोन चार दिवसांनी गळती तेथे असायची आणि खड्डा तेथे पडलेला होता. त्यामुळे समर्थ मंदिरकडून राजवाडय़ाकडे येणाऱया वाहनांना तेथे वेग कमी करावा लागायचा. तेथे शाळा असल्याने अपघाताची भिती व्यक्त होत होती.
दरम्यान, सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱया शहापूर योजनेच्या विद्युत वाहिनीचे काम मंगळवारी हाती घेतले आहे. त्यासाठी शटडाऊन असल्याने त्याच काळात फायर फाटयर लाईनची दुरुस्ती करण्याचे काम पाणी पुरवठाचे अभियंता शहाजी वाठारे यांनी सुचित केले. त्यांनी केलेल्या सुचनेनुसार कामाला प्रारंभ ठेकेदार सागर पवार यांनी केला. सागर पवार यांनी कर्मचारी, जेसीबी बोलवून सकाळपासून कामाला सुरुवात केली. वाहतूक वळवून काम सुरु केले. प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे कांबळे हे कामाच्या ठिकाणी होते.
बकरे कापून करणार होते अनोखे आंदोलन
राजधानी टॉवरसमोर सतत खड्डय़ांची समस्या उदभवत असून ती समस्या पालिकेला सोडवता येत नसल्याने स्थानिक नागरिक त्या जागेवर बकरे कापून अनोखे आंदोलन करुन पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्याच्या हालचाली सुरु होत्या. तत्पूर्वीच काम करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा प्रश्न कायमचा सोडवण्यात येणार असल्याने स्थानिकांनी हे आंदोलनाच्या नियोजनाबाबत तुर्तास स्थगीती दिल्याचे विवेकानंद बाबर यांनी सांगितले.