कॉ. अनिल आजगावकर यांचे मत
प्रतिनिधी /बेळगाव
देशाचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प हा महत्त्वाकांक्षी असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशी होते हे पाहावे लागेल, असे अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना कॉ. अनिल आजगावकर यांनी स्पष्ट केले. रामदेव गल्ली येथील शहीद भगतसिंग सभागृहात ते बैठकीत बोलत होते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून पुढे आणलेली सप्तर्षी योजना विकासाला चालना देणारी असून अंमलबजावणीत हे सप्तर्षी तळपले तरच भारताची अर्थव्यवस्था मजबूत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होईल, असे प्रतिपादन केले होते. मात्र, अधिकृत आकडेवारी पाहता शेती व शेतीपूरक असलेल्या क्षेत्राचा विकास दर 3 ते साडेतीन टक्क्यांवरच रेंगाळला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादनही गोठले आहे. अर्थसंकल्पात ही स्थिती सुधारण्यासाठी भरभक्कम तरतुदींची अपेक्षा होती. मात्र, ती प्रत्यक्षात झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खतांचे अनुदान कमी करण्यात आले. भारतीय शेतकऱ्यांस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या लहरीवरच सोडल्याचे या अर्थसंकल्पामध्ये दिसून येत आहे. अ-औद्योगिकीकरण (डी-इंडस्ट्रियलायझेशन) ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोरची मोठी समस्या आहे. कारखानदारी, लघुउद्योग क्षेत्र कमजोर होत चालले आहे. भारत देशाला अजूनही चिनी मालाच्या आयातीवरच अवलंबून राहावे लागत आहे. याचा परिणाम चीनबरोबरची व्यापारी तूट दिवसेंदिवस वाढत आहे. चीनचे एकंदर उपद्रव्यमूल्य ध्यानात घेता चीनवरील हे अवलंबित्व देशास भविष्याच्यादृष्टीने धोकादायक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारतास औद्योगिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, उत्पादन संलग्न उत्तेजन व सवलत योजना, स्टार्टअप इंडियासारख्या योजनांसाठी अर्थसंकल्पामध्ये अधिक तरतूद हवी होती. मात्र, ती प्रत्यक्षात झाली नसल्याने पुन्हा देशाचा विकास मंदावण्याची शक्यता असल्याचे अनिल आजगावकर यांनी सांगितले. याच बरोबरीने मनरेगा, अंगणवाडी, मध्यान्ह आहार, सामर्थ्य ही महिला सबलीकरण योजना, वयोवृद्ध, विधवा, अपंग पेन्शन योजना, शिक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण योजना या समाज कल्याणकारी योजनांचा आढावा घेऊन या योजनांसाठी अर्थसंकल्पामध्ये पुरेशी तरतूद नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
व्यासपीठावर कॉ. नागेश सातेरी उपस्थित होते. कार्यक्रमाला व्यावसायिक, नागरिक, प्रगतशील लेखक तसेच अर्थतज्ञ उपस्थित होते.