राजद आमदाराकडून लक्ष्य ः तेजस्वी हेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार
वृत्तसंस्था/ पाटणा
राजदचे आमदार सुधाकर सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 2005 मध्ये नितीश कुमार हे सत्तेवर आल्यापासून राज्य विकासाच्या शर्यतीत मागे पडले आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात सरकार सुरळीत चाललेले नाही. राज्याचे नेतृत्व योग्यप्रकारे करता येत नसताना नितीश यांना पंतप्रधानपदाची स्वप्नं पडू लागली आहेत. परंतु नितीश कुमार हे पंतप्रधान होण्यापेक्षा राष्ट्रपती राजवट लागू करणे अधिक चांगले ठरेल असे सुधाकर सिंह यांनी म्हटले आहे.
नितीश कुमार हे पदावर कायम राहू इच्छितात. संयुक्त जनता दल हा लोकशाहीवादी पक्ष नाही. तर राजद नेते तेजस्वी यादव हे बिहारसाठी सर्वात योग्य मुख्यमंत्री ठरणार आहेत. देशात नरेंद्र मोदींना पर्याय असू शकत नाही. नितीश कुमार हे पंतप्रधान होण्यापेक्षा राष्ट्रपती राजवट येणे अधिक चांगले ठरेल. नितीश कुमार यांना आता मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात यावे. तेजस्वी यादव हेच याच पदासाठी योग्य दावेदार आहेत. संजद सत्तापिपासू लोकांचा कळप असल्याची टीका सुधाकर सिंह यांनी केली आहे.
राजद प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचे पुत्र आणि राजद आमदार सुधाकर सिंह यांना नितीश कुमार यांच्यावर टीका केल्यानेच मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु तरीही त्यांनी नितीश कुमार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. याप्रकरणी सुधाकर यांना राजदकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सुधाकर सिंह यांना अनेकदा यासंबंधी इशारा देखील दिला होता.