फाल्गुन वद्य द्वितीया शके 1571 या दिवशी संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. आजही या दिवशी देहू येथे ज्या ठिकाणाहून (वैकुंठगमन स्थळ) महाराज वैकुंठाला गेले तेथे लाखो वैष्णवभक्त या घटनेचे स्मरण म्हणून संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले निर्याणाचे अभंग म्हणतात. ही घटना अलौकिक आहे म्हणून नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वप्रथम जाणले पाहिजे की संत तुकाराम यांचा जन्म आणि वैकुंठगमन हे आपल्यासारखे कर्मबंधनामुळे झालेले नाही तर भगवंताच्या इच्छेनुसार झालेले आहे. संत तुकाराम हे स्वेच्छेने भगवंताची सेवा करण्यासाठी या जगामध्ये आले आणि आपले कार्य समाप्त झाल्यावर त्यांनी स्वेच्छेने या जगाचा निरोप घेतला.
आपण कोठून आणि कशासाठी आलो याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी । आलो याची कारणासी । बोलिले जे ऋषी । साचभावे वर्ताया ।। अर्थात ‘आम्ही वैकुंठात वास्तव्य करणारे आहोत पण व्यासदेव ऋषींनी दिलेल्या वेदप्रणीत मार्गाचे पालन करून दाखवण्यासाठी या भौतिक जगात आलो आहोत,’ त्याचप्रमाणे, धर्माचे पाळण । करणे पाखांड खंडन ।। हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।। अर्थात ‘सर्व पाखंड (वेद विरुद्ध) मतांचे खंडन करून वेद प्रतिपादित धर्म रक्षण (पाळण) करावा, प्रत्येकाच्या हृदयात भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे बीजारोपण करण्यासाठी प्रचार करावा, हेच काम आम्हास करावयाचे आहे.’ यावरून आपल्याला समजते की संत तुकाराम हे सामान्य व्यक्ती नव्हते, तर ते भगवंताच्या आज्ञेनुसार या भौतिक जगात भगवद्भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आले होते.
जवळ जवळ बेचाळीस वर्षे या जगामध्ये राहून हरिभक्तीचा प्रचार आणि प्रसार केल्यानंतर होळी पौर्णिमेनंतर फाल्गुन वद्य प्रतिपदेच्या रात्री, वैकुंठपती तुकारामांना म्हणाले ‘आज रात्री आनंदाने नामसंकीर्तन कर आणि मग मी तुला माझे दिव्य धाम वैकुंठ येथे घेऊन जाईन’ यावर तुकाराम म्हणाले ‘हे भगवंता, माझी एक विनंती ऐका, मला निजधाम वैकुंठाला आपण घेऊन जात आहात, पण माझी इच्छा आहे की रात्रंदिवस नामसंकीर्तन करावे आणि इथे भू-वैकुंठ असताना मी आणखी कुठे जाण्याची इच्छा ठेवू?’ करुणाकर भगवंतांनी तुकारामांचे अंतरंग ओळखून ते त्यांना म्हणाले ‘या लोकांत निरंतर राहिल्याने लोकांची आस्था तुझ्यावर राहणार नाही, म्हणून तुझा दृढनिश्चय बाजूला ठेव आणि निजधाम वैकुंठाला परत ये.’ दुसऱया दिवशी तुकारामांनी टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष हरिभक्तांच्याबरोबर सुरू केला आणि स्वयंस्फूर्तीने निर्याणाचे अभंग गावयास सुरुवात केली. आपुल्या माहेरी जाईन मी आता । निरोप या संता हाती आला ।।1।। सुख दुःख माझे ऐकिले कानी । कळवळा मनि करुणेचा ।।2।। करूण सिद्ध मूळ साऊले भातुकें । येति दिसे एके न्यावयासी ।।3।। त्याची पंथे माझे लागलेसे चित्त । वाट पाहे नित्य माहेराची ।।4।। तुका म्हणे आता येतील न्यावया । अंगे आपुलिया मायबाप ।।5।। अर्थात ‘मी आता माझ्या माहेरी वैकुंठास जाईन, कारण या संतांकडून मला निरोप आला आहे. माझ्या सुखदुःखाची हकिकत, माझे मायबाप विठ्ठल रुक्मिणीने ऐकली असेल आणि माझ्याबद्दल कळवळा आला असेल. विठ्ठल रुक्मिणीने मला बोलावणे पाठविण्याची तयारी वस्त्र व प्रसाद पाठवून केली आहे असे दिसते. ते मला नेण्यासाठी येत आहेत, यासाठी मी आता रोज माहेरची वाट पहात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मला न्यायला माझे मायबाप लवकरच येतील.’
कधीही, कुणीही, कुठेही पाहिल्यावर तुकारामांना विचारले ‘तुम्ही कुठे चाललात?’ या प्रश्नाला त्यांचे एकच उत्तर असे, ‘मी वैकुंठाला चाललो आहे.’ कारण शुद्ध हरिभक्ताला सर्व ठिकाणी वैकुंठच दिसते. पण या वेळेला खरोखरच वैकुंठाला जाण्याची वेळ आली आहे असे म्हटल्यावर त्यांच्या पत्नीसहित कोणीही त्यावर विश्वास ठेवला नाही. मग तुकारामांनी मी वैकुंठाला चाललो मागे परतून येणार नाही असे सांगताना ते म्हणाले, घरीची दारीची भजा पांडुरंगा । वडिलांशी सांगा दंडवत ।।1।। मधाचिये गोडी मासी घाली उडी । गेलीची ती घडी पुन्हा न ये ।।2।। गंगेचा हा ओघ सागरासी गेला । मागे नाही आला कदाकाळीं ।।3।। ऐसी या गोष्टीची बरी राखा सोय । गेला तुका न ये परतोनि ।।4।। अर्थात घरच्या आणि इतर लोकांनाही सांगा, पांडुरंगाचे नित्य भजन करा. वडीलधाऱया मंडळींना माझा दंडवत सांगा. ज्याप्रमाणे मधामध्ये गेलेली माशी परत बाहेर येत नाही आणि सागराला गंगेचा ओघ मिळाल्यावर परत मागे फिरत नाही त्याप्रमाणे ही गोष्ट लक्षात ठेवा, वैकुंठाला गेलेला तुकाराम परतून येत नाही.’
त्यानंतर तुकारामांनी पांडुरंगाला दंडवत घातला आणि हरिनाम उच्च स्वरात गात मंदिराच्या बाहेर आले आणि इंद्रायणीच्या काठावर जाऊ लागले. जमलेल्या सर्व लोकांनी तुकारामांना विनवणी केली आणि म्हणाले, ‘कृपया आम्हाला सोडून कोठे जाऊ नका’. परंतु निश्चयी तुकाराम इंद्रायणीच्या काठावर आले व सर्वाना उद्देशून म्हणाले, आम्ही जातो तुमची कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ।।1।। वाढवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठ श्रीरंग बोलवितो ।।2।। अंतकाळी विठोबा आम्हांसी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका ।।3।। अर्थात ‘आम्ही आता जातो, माझ्यावर सर्वांची कृपा असावी अशी विनंती करतो. श्रीहरी मला वैकुंठाला बोलवीत आहेत, आणि फार वेळ झाला पांडुरंग माझ्यासाठी ति÷त उभे आहेत. आम्हाला अंतकाळी विठोबा प्रसन्न झाले आहेत, इतके सांगून तुकाराम सदेह गुप्त होत आहे.’ एवढय़ात तुकाराम ज्यासाठी उत्सुक होते ते आनंदाचे क्षण आले, शंखचक्रधारी श्रीहरी इंद्रायणी नदीच्या पलीकडच्या तीरावरून त्यांना दिसू लागले. पैल आले हरी । शंखचक्र शोभे करी ।।1।। गरुड येतो फडत्कारे । ना भी ना भी म्हणे त्वरे ।।2।। मुकुट कुंडलाच्या दीप्ती । तेजे लोपला गभस्ती ।।3।। मेघश्यामवर्ण हरी । मूर्ती डोळस साजरी ।।4।। चतुर्भुज वैजयंती । गळा माळ हे रुळती ।।5।। पितांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ।।6।। तुका झालासे संतुष्ट । घर आले वैकुंठपीठ ।।7।। अर्थात ‘शंख, चक्र ज्याच्या हातात शोभत आहेत असे श्रीहरी पलीकडून येत आहेत. त्यांच्या गरुड वाहनाचा फडत्कार ऐकू येत असून, तू भिऊ नकोस, तू भिऊ नकोस असे तो त्वरेने म्हणत आहे. श्रीहरीच्या मस्तकावरील मुकुटाचा व कानातील कुंडलांच्या तेजाने आकाशातील सूर्य निस्तेज झाल्यासारखा दिसतो आहे. मेघासारखा श्रीहरीचा श्यामवर्ण असून त्यांची मूर्ती सुंदर सुशोभित आहे. श्रीहरी चतुर्भुज असून गळय़ाभोवती वैजयंतीमाळा धारण केली आहे. त्यांच्या पीतांबराच्या झळाळीने दाही दिशा उजळून गेल्या आहेत, तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या घरी वैकुंठपती आले आहेत त्यामुळे मी अगदी संतुष्ट झालो आहे’.
तुकारामांच्या बरोबर जे लोक आले होते त्यांचे डोळे गरुडवाहनावरून येणाऱया झळाळीने दिपून गेले होते. थोडय़ाच वेळात सर्वांनी डोळे उघडले व त्यांनी सर्वत्र पाहिले, तुकाराम कोठेच दिसले नाहीत. सर्वत्र शोकसागर पसरला. गंगाजी मावळनी त्यांच्या जवळील तुकारामांनी निर्वाणाच्या आधी लिहिलेले अभंग वाचले. आम्ही जातो आमच्या गावा । आमुचा राम राम घ्यावा ।।1।। तुमची आमची हेचि भेटी । येथुनिया जन्मतुटी ।।1।। आता असो द्यावी दया । तुमच्या लागतसे पाया ।।2।। येता निजधामीं कोणी । विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ।।3।। रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला ।।4।। अर्थात ‘आम्ही आमच्या गावाला जात आहोत, आमचा रामराम घ्यावा. तुमची आमची इकडे भेट झाली आणि आता या भेटीचा अंत या जन्मातच होत आहे. आता मी तुमच्या चरणांना स्पर्श करून विनंती करीत आहे की, माझ्यावर दया असावी. निजधामाला यावयाचे असेल तर मुखाने नित्य विठ्ठल विठ्ठल म्हणा. आता मुखाने रामकृष्ण म्हणा तुका वैकुंठाला जातो आहे.’ जमलेल्या लोकांना अश्रू अनावर झाले, तुकारामांच्यावर सर्वांचे प्रेम किती होते हे शब्दात वर्णन करणे कठीण आहे.
-वृंदावनदास