पुणे / प्रतिनिधी :
एखादी निवडणूक जिंकलो किंवा हरलो, तर त्याने काही फार फरक पडत नाही. मात्र, कोणत्याही गोष्टीच्या विजय किंवा पराजयानंतर आम्ही त्याचे मूल्यमापन किंवा पोस्टमार्टम करीत असतो. ते आम्ही केले असून, यापुढे आम्ही काळजी घेऊ, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुश्रीफ यांच्यावरील कारवाईबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पराभव केल्यानंतर भाजपाचे नेते, तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच पुणे दौऱ्यावर आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्याप पंचनामे झाल्याकडे लक्ष वेधत विरोधक आक्रमक झाले आहेत. त्याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, की दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला, त्यानंतर तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्याची सुरुवातदेखील झाली आहे. तसेच सर्वांचे पंचनामे होण्यास थोडा वेळ लागणारच आहे. तसेच मला विरोधी पक्षाचे आश्चर्य वाटते. आम्ही त्यांच्या काळातील पैसे देत आहोत. आता रात्री पाऊस पडला, तर ते सकाळी गोंधळ घालण्यास सुरुवात करतात. हे योग्य नाही, असे त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापा टाकण्यात असल्याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, की मला त्याबाबत काहीही माहिती नाही. माध्यमातूनच ही माहिती पाहायला मिळत आहे.