ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्र भूषण पुरस्कारादरम्यान झालेल्या उष्माघाताच्या त्रासाने 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे मृत्यू उष्माघाताने नव्हे तर चेंगराचेंगरीमुळे झाले का? खोके सरकार नेमकं काय लपवतंय? असा सवाल उपस्थित केला आहे. पटोले यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून, त्यामध्ये या कार्यक्रमाचा व्हिडिओही शेअर केला आहे.
“महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमुळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो”, असे पटोले यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
रविवारी खारघर येथे डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळय़ासाठी तब्बल 7 लाख लोक सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उन्हात होते. भरउन्हात हा कार्यक्रम ठेवल्याने तसेच आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे 14 निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मोकळय़ा परिसरात सर्व शासकीय कार्यक्रम हे 12 ते 5 या वेळेत न करण्याचा निर्णय घेतला आहे.