वृत्तसंस्था/ सलालाह (ओमान)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील झालेल्या अ गटातील शेवटच्या सामन्यात भारताने थायलंडचा 17 गोलांनी एकतर्फी पराभव केला.
या स्पर्धेत भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने अ गटात आता 4 सामन्यातून 10 गूण मिळविले आहेत. भारताने अ गटातील विविध सामन्यात चीन तैपेई, जपान आणि थायलंड यांचा पराभव केला. तर पाकबरोबरचा सामना त्यांनी 1-1 असा बरोबरीत राखला होता.
थायलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघातील अंगड बिर सिंगने 13 व्या, 33 व्या, 47 व्या आणि 55 व्या मिनिटाला असे 4 गोल नोंदविले. कर्णधार उत्तमसिंग आणि अमनदीप लाक्रा यांनी प्रत्येकी 2, योगेंबर रावत, हुंडाल, विष्णूकांत सिंग, बॉबीसिंग धामी, शारदानंद तिवारी, अमनदीप, रोहित, सुमीत लाक्रा, राजिंदर सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या स्पर्धेत ब गटात मलेशिया आघाडीवर आहे. त्यांचा शेवटचा सामना ओमान बरोबर तसेच पाकचा शेवटचा सामना जपान बरोबर होणार आहे. या सामन्यानंतर उपांत्य फेरीतील इतर तीन संघ निश्चित होतील.