: अन्नु राणीचे सर्वाधिक सहा गोल, मुमताज खान व दीपिकाचे चार गोल
वृत्तसंस्था/ काकामिगाहारा (जपान)
महिलांच्या ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने धडाक्यात प्रारंभ करताना सलामीच्या लढतीत उझबेकिस्तानचा 22-0 ने धुव्वा उडवला. अन्नु राणीने सर्वाधिक सहा तर मुमताज खान व दीपिका यांनी प्रत्येकी चार गोल करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आता, भारतीय महिलांचा पुढील सामना दि. 5 रोजी मलेशियाविरुद्ध होईल.
ओमानमध्ये गुरुवारी भारतीय युवकांनी चौथ्यांदा ज्युनियर आशिया चषक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय युवकांच्या पावलावर पाऊल ठेवत महिलांनी देखील आशिया चषकामध्ये दणक्यात प्रारंभ केला. अन्नू राणीने 13, 29, 30, 38, 43 व 51 व्या मिनिटाला गोल नोंदवले. वैष्णवी फाळकेने 3 व 56 वे मिनिट, मुमताज खानने 6, 44, 47, 60 वे मिनिट, सुनीलिता टोप्पो 17 वे मिनिट, मंजू चौरसिया 26 वे मिनिट, दीपिका सोरेंग 18 व 25 वे मिनिट तर दीपिका 32, 44, 46 व 57 वे मिनिट, नीलमने 47 व्या मिनिटाला गोल करत उझबेकिस्तानला चांगलाच दणका दिला.
सामन्याच्या प्रारंभापासूनच भारतीय महिलांनी आक्रमक खेळ करत उझबेकिस्तानला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. तिसऱ्या मिनिटाला वैष्णवी फाळकेने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत आघाडी मिळवून दिली. यानंतर मुमताज खानने सहाव्या मिनिटाला मैदानी तर 13 व्या मिनिटाला अन्नुने गोल करत पहिल्या सत्रात भारताला 3-0 असे आघाडीवर नेले. दुसऱ्या सत्रातही भारताचा दबदबा राहिला. सुनीलिता टोप्पो, अन्नु, दीपिका सोरेंग, मंजू यांनी शानदार गोल करत मध्यंतरापर्यंत भारताला 10-0 अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.
यानंतर तिसऱ्या व चौथ्या सत्रात भारतीय महिलांनी तब्बल 12 गोल केले. अन्नू राणी, दीपिका, मुमताज व नीलम यांनी आक्रमक खेळताना उझबेकच्या खेळाडूंना चांगलेच बॅकफूटवर ढकलले. यामुळे शेवटपर्यंत त्यांना एकही गोल नोदवता आला नाही. अखेरीस भारतीय महिलांनी हा सामना 22-0 असा जिंकत स्पर्धेत विजयी सलामी दिली