जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचना : नोडल अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना बी-बियाणांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या माहितीसाठी बी-बियाणे वितरण केंद्रासमोर उपलब्ध असलेला साठा तसेच किंमत याची माहिती फ्लेक्सद्वारे उपलब्ध करावी, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळ व्यवस्थापनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. बियाणे वाटप सुरू झाले आहे. तहसीलदार, तालुकास्तरीय अधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्यातील शेतकरी संपर्क केंद्रांवर भेटी देवून त्याची तपासणी करावी. जिल्ह्यामध्ये एकूण 170 बियाणे वितरीत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्यप्रकारे बी-बियाणांचे वाटप करा, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करताना योग्यप्रकारे सर्व्हे करून त्याचा अहवाल उपलब्ध होताच 24 तासांत नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षणाचे काम तातडीने करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. ज्या भागामध्ये पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. त्या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा. याचबराब्sार कूपनलिकांची दुरुस्ती करण्यासाठी व इतर दुरुस्तीसाठी पाऊले उचलावीत, असे त्यांनी सांगितले.
पूर व्यवस्थापन नियोजन पथकाची तयारी ठेवा
कृष्णा व इतर नद्यांच्या काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण होतो. त्या गावांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे महत्त्वाचे आहे. यासाठी बोटी तयारीत ठेवाव्यात. ही सर्व तयारी पूर्ण करावी. सर्व तालुक्यांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करावे. पुराच्या काळात 24 तास फिरत्या पथकांची नितांत गरज असते. त्यासाठी त्या पथकांची नियुक्ती करावी. जनतेच्या आवाहनाला तातडीने प्रतिसाद द्या, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे निवारा केंद्र स्थापन करण्यासाठी पाऊल उचलून त्या ठिकाणी भेट देत रहावी. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय आपल्या परिसरातून बाहेर जाता कामा नये. तहसीलदार तसेच इतर अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यामध्ये ठाण मांडून रहावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पूरामुळे घरांची पडझड झाल्यास त्यांची तातडीने जीपीएसव्दारे सर्व्हे करणे महत्वाचे आहे. त्यासाठी गतीने काम करा, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. सध्या जिल्हयामध्ये चाऱ्याचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला आहे, असे पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर यांनी या बैठकीत सांगितले. या बैठकीला अप्परजिल्हाधिकारी के. टी. शांताला, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख वेणुगोपाल याचबरोबर जिल्हा पंचायतचे विविध अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नोडल अधिकारी हे व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे या बैठकीत सहभागी झाले होते.
7 लाख 10 हजार हेक्टरमध्ये खरीपचे उद्दिष्ट
जिल्ह्यामध्ये 7 लाख 10 हजार हेक्टर जमिनीमध्ये खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठरविण्यातआले आहे. शेतकऱ्यांना योग्य प्रकारे बी-बियाणे उपलब्ध करुन हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये 170 बियाणे वितरीत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. अथणी 14, बैलहोंगल 34, बेळगाव 12, चिकोडी 19, गोकाक 14, हुक्केरी 38, खानापूर 7, रायबाग 3, रामदुर्ग 11, सौंदत्ती 18 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. 45 हजार 875 क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आली आहेत.